Friday, February 13, 2026 06:42:46 PM

Raj Thackeray On NCP President: 'अध्यक्ष कोणीही पाटील चालेल, पण...'; राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरून राज ठाकरेंचं परखड मत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावरून आता राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. या वादात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उडी घेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे.

raj thackeray on ncp president  अध्यक्ष कोणीही पाटील चालेल पण  राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरून राज ठाकरेंचं परखड मत

Raj Thackeray On NCP President: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदावरून आता राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. या वादात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट उडी घेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. 'राष्ट्रवादीसारख्या रांगड्या मराठी पक्षाचा अध्यक्ष हा मराठी माणूसच असायला हवा,' असे म्हणत त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला आहे.

राज ठाकरेंच्या 'एक्स' पोस्टने खळबळ
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संताप व्यक्त करताना राज ठाकरेंनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या जो विचका झाला आहे, त्यावर बोलण्याचीही इच्छा होत नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस हा अस्सल मराठमोळ्या मातीतला पक्ष आहे. या पक्षाचे नेतृत्व कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नको, हे माझे ठाम मत आहे.'

हेही वाचा - Rohit Pawar Tweet: ‘अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही’; सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर रोहित पवारांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

प्रफुल्ल पटेल विरुद्ध 'मराठी चेहरा'
अजित पवारांच्या पश्चात पक्षाची कमान कोणाकडे जाणार, यावरून पक्षात दोन गट पडल्याची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल सध्या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्या सरकारमध्ये व्यस्त राहतील, असा तर्क लावून पटेल अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे बोलले जाते. राज ठाकरेंनी 'पाटील' हा शब्द वापरून पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांना किंवा कुटुंबातील सदस्यांना पाठबळ दिले असून, पटेलांच्या माध्यमातून पक्षावर अमराठी वर्चस्व येऊ नये, असा इशारा दिला आहे.

पवार कुटुंबाच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, मात्र पक्ष संघटनेवर पकड कुणाची राहणार? हा प्रश्न कायम आहे. राज ठाकरेंच्या या विधानानंतर पक्षात 'मराठी विरुद्ध अमराठी' असा नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. तसेच, यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत नवी अडचण निर्माण होऊ शकते.


सम्बन्धित सामग्री