मुंबई : शरद पवार गटामध्ये सर्व काही अलबेल नाही आहे. शरद पवार गटामध्ये कोणत्याही क्षणी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पक्षातील अस्वस्थ नेते आणि कार्यकर्त्यांना अजित पवार हा पर्याय खुणावत असला तरी योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे.
सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. नेमकी याचवेळी शरद पवार गटामध्ये नाराजी वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात येणाऱ्या काळात पक्षाचं आणि पर्यायाने आपलं भवितव्य काय असेल याबाबतची चिंता काही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे मनात खदखद असलेले अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवारांच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: लाडक्या बहिणींची पाण्यासाठी वणवण
शरद पवार गटात कुठल्याही क्षणी मोठ्या घडामोडी घडू शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. पक्षांतर्गत संघर्ष हा सध्या शरद पवार गटातील नेत्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. पक्षांतर्गत संघर्षाला बळी पडण्यापेक्षा अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा विचार अनेक नेते करत आहेत. काही खासदार आणि आमदार अजित पवार यांच्याशी संपर्क ठेवून आहेत.
पवार कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत, हे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेत केंद्रस्थानी असणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत जाण्यात शरद पवार गटातील खासदार आणि आमदारांना काही अडचण वाटत नाही. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तेव्हा हे चित्र अधिक स्पष्ट होईल.