विधान परिषदेसाठीचे बिगूल वाजले असून धाराशिव जिल्ह्यात कोणाला संधी मिळणार याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागलेलं आहे. याचपार्श्वभूमिवर इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून कोण आमदार होणार असा प्रश्न सर्वत्र पडला आहे. मे महिन्यात विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. तर निकाल 12 मे रोजीच सायंकाळी जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
यादरम्यान सध्या धाराशिव जिल्ह्यातून भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, हे नावे चर्चेत आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वस्त अशी ओळख असणारे शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे नाव देखील चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा- Massajog Election: मस्साजोगचा सरपंच कोण होणार? 'बिनविरोध'च्या प्रयत्नांना सुरूंग; आता थेट मतदानातून होणार फैसला
तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचे नावे चर्चेत आहेत. कारण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी शब्द दिला होता. पक्षीय बलाबलाचा विचार करता विधानसभेतील सध्याच्या आमदारांच्या संख्येनुसार एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी सुमारे 28 ते 29 मतांच्या कोट्याची गरज भासणार आहे. महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे भाजप पाच जागा सहज निवडून आणू शकते. शिवसेना (शिंदे गट) दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक तर महाविकास आघाडीची एक जागा सहज निवडून येऊ शकते. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला विधानपरिषदेवर संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचे आहे.