Monday, March 09, 2026 07:48:13 AM

Nagpur Cotton Fire: पांढऱ्या सोन्याची राख, जिनिंगला लागलेल्या आगीत 18 हजार क्विंटल कापूस जळून खाक

भंडारबोडी परिसरातील कल्पना जिनिंग कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचा 18 हजार क्विंटल कापूस भस्मसात झाला आहे.

nagpur cotton fire पांढऱ्या सोन्याची राख जिनिंगला लागलेल्या आगीत 18 हजार क्विंटल कापूस जळून खाक

Nagpur Cotton Fire: नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात गुरुवारी सायंकाळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. भंडारबोडी परिसरातील कल्पना जिनिंग कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचा 18 हजार क्विंटल कापूस भस्मसात झाला आहे. या आगीत सुमारे 12 कोटी रुपयांची मालमत्ता खाक झाली असून एका 8 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

आगीचा थरार आणि बालक जखमी
कुही-आंभोरा मार्गावरील या कारखान्यात काम सुरू असताना अचानक धुराचे लोट निघू लागले. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी कारखान्यात असलेल्या कामगारांची जीव वाचवण्यासाठी पळापळ झाली. दुर्दैवाने, या गोंधळात रोहन सुरेश दूधवे हा 8 वर्षांचा मुलगा आगीच्या विळख्यात सापडून भाजला. त्याला तातडीने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात (Medical) दाखल करण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

अग्निशमन दलाची शर्थीची झुंज
दरम्यान, आगीची माहिती मिळताच कुही, मौदा आणि उमरेड येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. कारखान्यात कापसाचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरली, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत ज्वाळा आणि धुराचे लोट कायम होते. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली होती.

हेही वाचा - Mumbai Fire News : गोरेगावात 45 मजली इमारत आगीच्या विळख्यात; रहिवाशांची टेरेसकडे धाव

शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही ठिणगी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून कारखान्यातील 'फायर ऑडिट' आणि सुरक्षा यंत्रणांची चौकशी केली जाणार आहे. तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे सावट
इतक्या मोठ्या प्रमाणावर कापूस जळाल्याने स्थानिक बाजारपेठेवर आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल असलेल्या कापसाचे असे नुकसान होणे दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या