पंढरपूर: ज्येष्ठ ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे यांनी एका खळबळजनक भविष्यवाणीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते येत्या 36 तासांत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर या युद्धात पाकिस्तानला केवळ जीवितहानी आणि वित्तहानीच होणार नाही, तर कदाचित त्यांचा काही भूभाग भारताच्या ताब्यात देखील येईल, असे ते म्हणाले.
अतुलशास्त्री भगरे हे ख्यातनाम ज्योतिषाचार्य असून त्यांनी यापूर्वी अनेक राजकीय आणि जागतिक घडामोडींची अचूक भाकिते केली आहेत. त्यांच्या नव्या भविष्यवाणीमुळे राजकीय, लष्करी आणि सामान्य नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या हालचाली, ग्रहस्थिती आणि भारत-पाकिस्तानमधील तणाव या सगळ्याचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे.
ते म्हणाले, शनी, मंगळ आणि राहू यांची स्थिती सध्या अत्यंत असामान्य आहे. या ग्रहांची एकत्रित ऊर्जा युद्ध, संघर्ष आणि भूमी संबंधित घडामोडी सूचित करते. विशेषतः भारताच्या कुंडलीतील मंगळाच्या स्थानावरून हे सूचित होते की भारत लष्करी पातळीवर मोठा निर्णय घेऊ शकतो. पाकिस्तानच्या कुंडलीतील सध्याचे ग्रहयोग त्यांच्यासाठी अत्यंत अपायकारक आहेत.
हेही वाचा: 'आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी...' मंत्री गुलाबराव पाटील यांची मिश्किल कबुली
पाकिस्तानचं ग्रहमान वाईट आहे. त्यांचा जन्म आपल्या आधी, रात्री 14 ऑगस्टला झाला. त्यामुळे दोन देशांच्या राशीत अंतर आहे, जसं आपल्याला अनुकूल, तसं त्यांना प्रतिकूल ग्रहमान आहे. त्यामुळे त्यांची कित्येक किमी भूमी आपल्याकडे येऊ शकते. पाकव्याप्त काश्मीर केवळ ताश्कंद करारामुळे त्यांच्याकडे गेला, पण लवकरच तिथे आपला झेंडा फडकेल. 36 तासात युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, मे महिना महत्त्वाचा आहे. 31 मे पर्यंत खूप मोठ्या घडामोडी या दोन देशांमुळे जगात घडतील असा अंदाज अतुलशास्त्री भगरे यांनी वर्तवला आहे.
ज्योतिषशास्त्र हे एक संभाव्यतेवर आधारित शास्त्र आहे आणि त्यातील भाकिते खरे ठरू शकतात किंवा नाहीही. त्यामुळे अतुलशास्त्री भगरे यांच्या वक्तव्याकडे एक सजग नागरिक म्हणून पाहणे आवश्यक आहे. यामुळे अफवा आणि भीती पसरवण्याऐवजी आपण अधिक माहितीवर आधारित चर्चा करावी.
दुसरीकडे, संरक्षण मंत्रालय किंवा कोणत्याही अधिकृत संस्थेने यासंबंधी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत या भविष्यवाणीचे खरे-खोटेपण ठरवणे कठीण आहे.
परंतु, अतुलशास्त्री भगरे यांचं ज्योतिषशास्त्रातील प्रावीण्य आणि त्यांची पूर्वीची अचूक भाकिते लक्षात घेता, त्यांच्या या विधानाकडे दुर्लक्षही करता येत नाही. हे भविष्यातील 36 तास किती निर्णायक ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.