अमरावती: प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधकांनी हा निर्णय देत त्यांच्या राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील भूमिकेला मोठा धक्का दिला आहे. एका न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात बँकेतील काही संचालकांनी कडूंविरोधात कारवाईची मागणी करत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, नाशिक येथील न्यायालयाने एका गुन्ह्यात बच्चू कडूंना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. हीच शिक्षा आणि त्याचा दाखला बँकेच्या अन्य संचालकांनी विभागीय सहनिबंधकांसमोर मांडली. त्यामुळे नियमानुसार, सहकारी संस्था कायद्यानुसार अशा शिक्षेच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीला पदावर राहण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.
हेही वाचा:सुधाकर बडगुजर भाजप प्रवेशासाठी सज्ज; स्थानिक भाजप नेत्यांची नाराजी कायम
या अनुषंगाने विभागीय सहनिबंधकांनी कडूंना नोटीस बजावत, अध्यक्षपदासाठी अपात्र का ठरवू नये, याबाबत आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती. नोटिशीनुसार 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष हजर राहून किंवा अधिकृत प्रतिनिधीमार्फत स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश होते. मात्र, अंतिम निर्णयात त्यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले आहे.
ही शिक्षा 2017 मधील नाशिकमधील एका प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आणि मारहाणीचा आरोप होता. विशेष न्यायालयाने 2021 मध्ये ही शिक्षा सुनावली होती. कडूंनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असले तरी, प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच विभागीय सहनिबंधकांनी त्यावर निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: Indrayani River Bridge Collapse: 'सत्तेचा उपयोग नेमका कशासाठी?', इंद्रायणी दुर्घटनेवर राज ठाकरेंचा सवाल
हा निर्णय बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासावर परिणाम करू शकतो, विशेषतः सहकारी संस्थांमधील त्यांच्या सहभागावर.