नांदेड: राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा गाजू लागलाय. शेतकऱ्यांची वाढती आर्थिक ओढाताण, आत्महत्या, आणि बँकांकडून मिळणाऱ्या नव्या कर्जाच्या अडचणी या साऱ्याचा विचार करता हा विषय अधिक तीव्र झाला आहे. पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कर्जमाफी झाली पाहिजे, हे आमचं ठाम मत आहे. आम्ही हा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहोत. केवळ घोषणा करून शेतकऱ्यांना थांबवता येणार नाही, असं म्हणत बच्चू कडूंनी शासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं. त्यांच्या मते, सरकारने केलेल्या घोषणांमुळेच शेतकऱ्यांनी आपली जुनी कर्जं भरलेली नाहीत आणि त्यामुळे त्यांना व्याजमाफीचाही लाभ मिळालेला नाही.
बच्चू कडू पुढे म्हणाले, माणिकराव कोकाटे यांचं मतही कर्जमाफीच्या बाजूने आहे. मग सरकारमध्येच मतभेद का? अडचण नेमकी कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत टाकलं आहे.
हेही वाचा: परळी निवडणुकीत प्रशासनाचा गैरवापर? धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
शेतकऱ्यांना सध्या नवीन कर्ज उपलब्ध होत नाही. बँका जुन्या कर्जाच्या थकबाकीमुळे नवीन कर्ज द्यायला नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकही खर्चाअभावी उध्वस्त होत आहे. काही शेतकऱ्यांना शेतीसाठी खते, बियाणे, मजुरी यासाठी पैसेच उभे राहात नाहीत. ही स्थिती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाली असल्याचा आरोप बच्चू कडूंनी केला.
याच संदर्भात बच्चू कडूंनी अतिशय तीव्र आणि आक्रमक विधान केलं , गरज पडली तर आम्ही गाड्यांची हवा काढू. हे विधान म्हणजे फक्त संतापाचा उद्गार नव्हे, तर शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्याची त्यांची कृतीशील भूमिका दर्शवणारा इशाराच आहे.
आम्ही केवळ टीका करत नाही, आम्ही लढतोही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचं आंदोलन हे केवळ राजकीय नाही, तर सामाजिक लढा आहे. काही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपली भूमिका अधोरेखित केली.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांची शैली आणि त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क लक्षात घेता, हे आंदोलन लवकरच राज्यभर उग्र रूप धारण करू शकतं.