छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झालेल्या स्फोटाचा तपास करत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्राथमिकदृष्ट्या बँक लुटीचा प्रयत्न वाटणाऱ्या या घटनेमागे प्रत्यक्षात जुन्या आर्थिक गैरव्यवहारातील पुरावे नष्ट करण्याचा हेतू होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून एक जखमी आरोपी अद्याप फरार आहे.
हि घटना वैजापूर तालुक्यामध्ये विरगाव परिसरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत घडली. काही दिवसांपूर्वी भरत शिवाजी कदम या व्यक्तीविरुद्ध खोटे दस्ताऐवज तयार करून 63 लाख रुपये लंपास केल्याचा गुन्हा विरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत होता, तसतसे आरोपीवरचा संशय खरा होत चालला होता. यामुळे मुख्य आरोपी भरत कदम याने या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी स्फोटकांचा वापर करत बँकेत स्फोट घडवण्याचा कट रचला.
भरत कदमने आपले चार सहकारी अक्षय ज्ञानेश्वर कराळे, सचिन सुभाष केरे, वैभव पंढरीनाथ केरे आणि धारबा बळीराम बिराडे यांना सोबत घेतले. या पाच जणांनी मिळून मालेगाव येथून सेकंड हँड गाडी खरेदी केली आणि तिच्या मदतीने हे संपूर्ण षड्यंत्र राबवले. बँकेत पेट्रोल बॉम्ब फेकून स्फोट घडवण्यात आला. या घटनेत एका आरोपीला जखमी अवस्थेत घटनास्थळावरून पळून जावे लागले. या फरार आरोपीचे नाव आप्पा बालाजीपणे असे असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाचा अपघाती मृत्यू ;गावात शोककळा
पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा स्फोट घडवून केवळ आर्थिक घोटाळ्याचे पुरावे नष्ट करणेच नव्हे, तर तपास दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी मोठ्या चतुराईने तपास करून केवळ 48 तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला. सध्या पोलिसांकडे आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, आणखी काही बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.
स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. बँकेचे अनेक महत्त्वाचे कागदपत्र आणि हार्ड डिस्क्स जळून खाक झाल्या. मात्र, पोलिसांनी तांत्रिक बाबींचा वापर करून सुरुवातीपासूनच संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्याचाच परिणाम म्हणून हे कटकारस्थान उघडकीस आले.
हा स्फोट केवळ बँक लुटीचा प्रयत्न नसून, एक पूर्वनियोजित षड्यंत्र होते, हे स्पष्ट झाले आहे. आरोपींविरुद्ध सध्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयीन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पुढील तपास सुरुच असून फरार आरोपीच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू आहे.