बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व आणि जनमाणसांत 'दादा' या नावाने अढळ स्थान निर्माण केलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (66) यांचे आज बुधवारी (28 जानेवारी 2026) सकाळी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या Learjet 45 (VT-SSK) या खाजगी विमानाला बारामती विमानतळावर उतरताना हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजितदादांसह विमानातील दोन वैमानिक आणि दोन कर्मचारी अशा एकूण पाच जणांचा जागीच अंत झाला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून, राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
"मी पुन्हा पोरका झालो!" : धनंजय मुंडेंचा तो हृदयद्रावक हुंदका
अजित पवारांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. बीडहून तातडीने बारामतीकडे रवाना होत असताना, एका निकटवर्तीय सहकाऱ्याने त्यांना फोन केला. यावेळी मुंडेंचा भावनांचा बांध फुटला. हुंदका दाटलेल्या आवाजात ते म्हणाले, "माझ्या वडिलांच्या निधनानंतर दादांनी मला कधीही वडील नाहीत असं वाटू दिलं नव्हतं, त्यांनी पितृछत्राची उणीव भरून काढली होती. आज पुन्हा एकदा मी पोरका झालो आहे..." इतके बोलून मुंडेंनी 'सॉरी, मी नंतर बोलतो' म्हणत फोन ठेवला. त्यांच्या या प्रतिक्रियेने अनेकांचे डोळे पाणावले. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे नाते हे केवळ मार्गदर्शक शिष्य असे नसून ते एक अतुट कौटुंबिक बंध होते.
हेही वाचा: Ajit Pawar Death: महाराष्ट्र पोरका ! अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा
नेमकी दुर्घटना कशी घडली?
सकाळी आठ वाजून 10 मिनिटांनी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे झेपावले होते. बारामतीत होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी ते निघाले होते. मात्र, सकाळी आठ वाजून 45 मिनिटांच्या सुमारास बारामती विमानतळावर धावपट्टीच्या जवळ विमान उतरवताना तांत्रिक बिघाड झाला. दाट धुके आणि खराब हवामानामुळे विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीवरच कोसळले. धडक इतकी भीषण होती की विमानाचे तुकडे झाले आणि विमानाने पेट घेतला. बचाव पथक पोहोचेपर्यंत सर्वकाही भस्मसात झाले होते.
एका झंझावाती नेतृत्वाचा अस्त
अजित पवार म्हणजे 'स्पष्टवक्तेपणा' आणि 'कामाचा धडाका' यांचे दुसरे नाव. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले ते नेते होते. आज त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर अवघा महाराष्ट्र एका कणखर नेतृत्वाला मुकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला असून, "एका खऱ्या मित्राला आणि विकासपुरुषाला आम्ही मुकलो आहोत," अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा: Riteish Deshmukh Tweet: ‘त्यांचं अकाली जाणं ही अतिशय मोठी हानी…’; अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने रितेशला मोठा धक्का