मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात आज दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तेजस्विनी घोसाळकर यांनी ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेच्या लढतीत विजय मिळवला आहे. शिवसेना (UBT) गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तेजस्विनी घोसाळकर यांच्यासाठी ही निवडणूक केवळ राजकीय नव्हती, तर ती एक भावनिक लढाई देखील होती.
अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत
प्रभाग क्रमांक 2 मधील ही निवडणूक संपूर्ण मुंबईत चर्चेचा विषय ठरली होती. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली सहानुभूती आणि भाजपची संघटनात्मक ताकद यांच्या जोरावर तेजस्विनी घोसाळकर यांनी विरोधकांचे कडवे आव्हान मोडीत काढले. भाजपने ही जागा जिंकत दहिसर पट्ट्यात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
हेही वाचा: Solapur Election Result : तुरुंगात असूनही महापालिका निवडणुकीत करिश्मा ! खुनाचा आरोप असलेल्या शालन शिंदे विजयी
विजयानंतर तेजस्विनी घोसाळकर यांची प्रतिक्रिया
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजस्विनी घोसाळकर अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजपच्या नेतृत्वाला दिले. त्या म्हणाल्या “आज मला खूप आनंद होत आहे. हा विजय माझा नसून दहिसरच्या जनतेचा आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या भाजप परिवाराचा आहे. भाजपच्या आमदार मनीषाताई चौधरी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि खासदार पियुष गोयल व माजी नगरसेवक जगदीशभाई यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हा विजय सुकर झाला.”
अभिषेक घोसाळकर यांच्या आठवणीने डोळे पाणावले
आपल्या विजयाचा आनंद साजरा करताना त्यांनी त्यांचे पती दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची आठवण काढली. अभिषेक घोसाळकर यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली होती, त्या संकटाच्या काळात दिलेल्या साथीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “जनतेने दिलेला हा कौल अभिषेक यांच्या कामाची पावती आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय भूकंप; शिवसेनेच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग? MIM ची अनपेक्षित मुसंडी