Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी आता केंद्रीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत, केंद्र सरकारने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) कडे सोपवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अधिकृत पत्र लिहून तपासाच्या प्रगतीबाबत आश्वस्त केले आहे.
'ब्लॅक बॉक्स' ठरणार महत्त्वाचा दुवा
केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणेने घटनास्थळावरून विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' (Flight Data Recorder & Cockpit Voice Recorder) यशस्वीरित्या ताब्यात घेतला आहे. हा तांत्रिक पुरावा अपघाताच्या शेवटच्या क्षणांतील वैमानिकांचे संभाषण आणि विमानाची स्थिती स्पष्ट करण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे. विमानाचे देखभाल रेकॉर्ड्स, इंधन गुणवत्ता आणि उड्डाणादरम्यानचे हवामान या सर्व बाबींचे सखोल विश्लेषण केले जात आहे. हा तपास ठराविक मुदतीत पूर्ण केला जाईल आणि त्याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याला सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे भविष्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (VVIP) प्रवासासाठी अधिक कडक सुरक्षा नियमावली लागू केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Death : "मीडियाआधी ही माहिती मला समजली" अजित पवारांच्या अपघातानंतर पहिला कॉल कोणाला?
मुख्यमंत्र्यांची आग्रही भूमिका
अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि धडाडीच्या नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणे ही राज्याची कधीही न भरून निघणारी हानी आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या आग्रहामुळेच तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चूक यांपैकी नेमका कशामुळे घात झाला, हे आता स्पष्ट होणार आहे.
साश्रू नयनांनी 'दादां'ना अखेरचा निरोप
दुसरीकडे, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. हा सोहळा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात भावूक प्रसंगांपैकी एक ठरला. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यासह देशातील दिग्गज नेते आपल्या लाडक्या सहकाऱ्याला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. पार्थ आणि जय पवार या दोघांनी आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता सर्वांच्या नजरा AAIB च्या अंतिम चौकशी अहवालाकडे लागल्या आहेत.