Wednesday, May 14, 2025 11:58:12 PM

Chhatrapati Sambhajinagar: उन्हामुळे ग्रामीण भागात प्राण्यांची सावलीसाठी धडपड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माणसाबरोबर प्राणीही सावली आणि पाण्याच्या शोधात भटकंती करून हिरवाई असलेल्या लिंबाच्या झाडाखाली विसावा करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

chhatrapati sambhajinagar उन्हामुळे ग्रामीण भागात प्राण्यांची सावलीसाठी धडपड

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून उन्हाचा पारा चाळीसच्यावर गेल्याने माणसाबरोबर प्राणीही सावली आणि पाण्याच्या शोधात भटकंती करून हिरवाई असलेल्या लिंबाच्या झाडाखाली विसावा करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

एप्रिल महिना येताच सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पैठण, सोयगाव, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, खुल्लताबाद तालुक्यात पाणी टंचाईमुळे शेती ओसाड पडली आहे. उन्हाच्या प्रखरतेमुळे शेती काम करणाऱ्या कामगारांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

उन्हामुळे नागरिक कूलर, एसी, फॅनद्वारे गारवा घेत आहे. परंतु पशुपक्षी, गुराढोरांना दुसरा कोणताही गारवा घेण्याचा पर्याय नाही. रानोमाळ पाण्यासोबतच सर्वजण सावलीचा शोध घेत आहेत. विजेच्या लपंडावामुळे रात्रंदिवस विज गायब होऊन नागरिकांना उकड्यात दिवस काढावे लागत आहेत. प्रत्येकाला थंड पाणी प्यावेसे वाटत असून प्रत्येक नागरिक घरोघरी पाण्याचा जार, फ्रिज, गरिबाचं फ्रिज म्हणून ओळखले जाणारे माठ घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

हेही वाचा : Uddhav and Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

उन्हामुळे काही नागरिक लिंबू सरबत, मोसंबी सरबत, अशा पद्धतीच्या शीतपेयाला पसंती दाखवत आहेत. तसेच पत्र्याच्या घरावर उन्हामुळे उकाडा जास्त होत असल्याने अनेक नागरिकांनी आपल्या घराच्या पत्र्यावर, तुराट्या, सरमाड, कागदी पुष्टी टाकून थंड गारव्याचा पर्याय शोधला आहे. सध्या कडू लिंबाच्या झाडाशिवाय कुठेही सावली उपलब्ध नसल्याने पशुपक्षी,गुरेढोरे शेतकरी, शेतमजूर, लिंबाच्या सावलीत आश्रय घेताना दिसत आहेत.

रानोमाळ भटकंती करूनही हिरवा चारा सापडत नाही. दुपारचे बारा वाजले की जनावरे हिरव्या झाडांकडे धाव घेऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत विसावा घेतात. उन्हाची दाहकता पोटाच्या दाहकतेपेक्षा जड वाटत आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी बाहेरगावाहून हिरवा चारा उपलब्ध करून घेत होतो. परंतु यंदा कुठेही बाहेर जाता येत नसल्याने नाईलाज आहे. चारा जनावरांना खाऊ घालावा लागतो असे पैठण तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी विकास डवणे यांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री