मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
'या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या हल्ल्यात जी निष्पाप माणसं मृत्यूमुखी पडली, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,' असे फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांनी गमावला जीव
तसेच त्यांनी सांगितले की, 'जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अधिकारक्षेत्राखाली येते, त्या विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याशीही मी फोनवरून थेट संपर्क साधला असून, संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे.'
हा हल्ला श्रीनगरपासून अवघ्या 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी, लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी केला. काही पर्यटकांच्या सांगण्यानुसार, हल्लेखोरांनी धर्म विचारून लोकांवर गोळीबार केला.
हेही वाचा: पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, आम्हालाही मारा; पहलगामच्या डोंगरात घडलेला थरार समोर
नेमकं काय घडलं?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवले आहे. श्रीनगरपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी लष्करी गणवेशात येत पर्यटकांवर अचानक गोळीबार केला. या भीषण घटनेत निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून, काही वाचलेल्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना ठार मारले.