मुंबई: काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये देशभरासह महाराष्ट्रातील 6 प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. मृत हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था डोंबिवली येथील भागशाळा मैदानात करण्यात आली असून, त्यांच्या नातेवाईकांना आणि सर्वसामान्य जनतेला अंतिम दर्शन मिळावे यासाठी त्यांचे पार्थिव भागशाळा मैदानात ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर, डोंबिवली येथील विष्णूनगर स्मशानभूमीमध्ये मृत हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
हेही वाचा: शिवसेनेचं मदत पथक श्रीनगरमध्ये दाखल; राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न
या दरम्यान, मृत हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांना अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवली येथे दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी संबंधित कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांनी संपूर्ण कुटुंबियांना धीर दिला. या घटनेवर संपूर्ण राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असून विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पहलगाम येथे मृत झालेल्या महाराष्ट्रातील मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1 - अतुल मोने (डोंबिवली)
2 - संजय लेले (डोंबिवली)
3 - हेमंत जोशी (डोंबिवली)
4 - संतोष जगदाळे (पुणे)
5 - कौस्तुभ गणबोटे (पुणे)
6 - दिलीप देसले (पनवेल)