Udaykumar Aher: राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या जीविताला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार बीडमधील एका नागरिकाने एसआयटीकडे (SIT) केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उदयकुमार आहेर यांचा गंभीर आरोप आणि घटनांचा संदर्भ
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी ही तक्रार अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आहेर यांच्या मते, मागील काही घटनांचा साखळी पद्धतीने विचार केल्यास हे प्रकरण संशयास्पद वाटते. त्यांनी 'दादांचा' (अजित पवार) झालेला अपघात, विमान कंपनीचे भोंदू बाबाशी असलेले संबंध आणि रूपाली चाकणकर यांचे त्या भोंदू बाबाशी असलेले नाते यांकडे लक्ष वेधले आहे. तसेच सुनेत्रा वहिनींनी रूपाली चाकणकर यांचा घेतलेला राजीनामा आणि अजित पवारांच्या बंगल्याबाहेर झालेल्या काही विशिष्ट पूजा, या सर्व गोष्टींचा या तक्रारीशी संबंध असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
चौकशीमध्ये 'या' मुद्द्यांचा समावेश करण्याची मागणी
उदयकुमार आहेर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 'सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, यामध्ये अशोक खरात यांचा किंवा अपघाताचा काही संबंध आहे का, याचाही तपास व्हायला हवा,' असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी या प्रकरणातील गूढ उकलण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. सध्या या तक्रारीमुळे रूपाली चाकणकर आणि सुनेत्रा पवार यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून पोलीस आता यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Ambadas Danve: 'प्रशासकीय अधिकारी सरकारच्या दबावाखाली बोलतात...'; मनीषा म्हैसकर यांच्या गौप्यस्फोटावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
निलेश राणेंची सावध प्रतिक्रिया
दरम्यान, या संदर्भात बोलताना निलेश राणे यांनी सावध भूमिका घेतली असून, "जर अशा प्रकारची काही धमकी किंवा मेसेज आला असेल, तर पोलीस या प्रकरणाचे गांभीर्य तपासून योग्य तो निर्णय घेतील आणि कारवाई करतील," असं म्हटलं आहे.