नरेंद्र मोदी आणि संजय राऊत
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला आघाडी मिळाली असून तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत भाजपचे कमळ फुलताना दिसत आहे. दिल्लीकरांनी सत्ताधारी ‘आप’ला नाकारल्याचे निकालाच्या सुरूवातीच्या कलांमध्ये पहायला मिळत आहे. काँग्रेसची अवस्था बिकट असून येथे एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर नाही. या निकालादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली. यात त्यांनी राजधानी दिल्लीत देखील ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, “केजरीवाल यांना ५ वर्ष काम करू दिले नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद देत जास्तीचे आधिकार देण्यात आले. आपसह सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही प्रमुख नेत्यांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकालं. हाच फॉर्म्युला महाराष्ट्रात झाला. आत दिल्लीत झाला. पुढे बिहारमध्ये देखील होईल.”
हेही वाचा : Delhi Election Result : 'आप'चं गणित कुठे चुकलं की काय? काय असू शकतात मागे पडण्याची कारणं?
पुढे बोलताना राऊत यांनी काँग्रेस आणि आप यांच्या युतीवर भाष्य केले. ते म्हणाले की, “दिल्ली निवडणुकीत जर काँग्रेस आणि आप एकत्रित लढले असते. त्यांचे मनोमिलन झाले असते. तर आता जी परिस्थिती दिसत आहे. तशी परिस्थिती आली नसती. काँग्रेस आणि आप एकसाथ असते तर पहिल्या तासभरातच भाजपचा पराभव झाला असता.”
राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
दिल्लीत भाजपची मुसंडी, आपची पिछेहाट
दिल्ली निवडणुकीच्या निकालात भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार, भाजपचे उमेदवार ४२ जागांवर आघाडीवर आहेत. तर आपचे उमेदवार हे २८ जागांवर पुढे आहेत. काँग्रेसला अद्याप आपला खाता देखील उघडता आलेला नाही. हाच ट्रेंड कायम राहिल्यास दिल्लीत भाजपची सत्ता येऊ शकते.