मुंबई: गडचिरोलीतील माओवादी मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने आपल्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. भूपतीवर विविध राज्यात मिळून तब्बल दहा कोटींहून अधिक बक्षीस होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. यावेळी भविष्यात आणखी काही माओवादी आत्मसमर्पण करतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गेल्या 40 वर्षांपासून सातत्याने माओवाद्यांशी लढणारा गडचिरोली जिल्हा, सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा भाग देखील माओवादाने ग्रस्त होता. त्यामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे. हा सर्व भाग मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला. ज्यावेळी कोडापल्ली सितारामय्याने पीपल्स वार ग्रुप तयार केला, त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि येथील युवकांमध्ये व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला".
Guardian Minister of Gondia: बाबासाहेब पाटलांनी दिला गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा, इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री
"भारतीय संविधानामुळे आपल्याला न्याय मिळवू शकत नाही, असा गैरसमज तेव्हा तेथील युवकांमध्ये निर्माण केला गेला, तसेच जंगलामधून आपण राज्य चालवून एक नवी व्यवस्था उभी करू अशा प्रकारचं स्वप्न त्यावेळी तरुणांना दाखवलं गेलं. त्यावेळी अनेक तरुण या स्वप्नाला बळी पडले, त्यांना वाटलं की त्या व्यवस्थेतून समता येईल. परंतु, खरी समता फक्त संविधानामुळेच येऊ शकते. त्या काळात अनेक तरुण माओवादी चळवळीकडे वळले. पण त्यानंतर त्यांच्या सर्व स्वप्नांचा खरा चेहरा समोर आला. आज आपण भूपतीचं आत्मसमर्पण घेतलं आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
पुढे बोलताना, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षात एक योजना आखण्यात आली. त्यामध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच दुसरीकडे जे लोकं शस्त्र घेऊन हिंसाचार करतात, त्यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवायचे. एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत सहभागी व्हायचं. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं. अशा प्रकारची योजना आखण्यात आली", असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.