पुणे: चैत्र महिन्याच्या रविवारी जेजुरी नगरीत भाविकांची मांदियाळी जमली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या मार्तंड भैरव खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. "येळकोट येळकोट जय मल्हार" च्या जयघोषाने जेजुरीगड दुमदुमून गेला, तर खोबरं, भंडाराच्या उधळणीत भक्तीभावाचा सागर वाहत आहे.
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सुरू झालेल्या या यात्रेला भाविकांनी जत्रेचा उत्साहही मिळवून दिला. पहाटे पाच वाजताच मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले, आणि त्यानंतर दर्शनासाठी लागलेली रांग ही लाखांच्या घरात गेली तर संपूर्ण परिसर भक्तांचा जल्लोष झेंड्यांच्या लहरी आणि ढोल-ताशांच्या गजराने गजबजून गेला.
अनेक भक्त आपापल्या कुटुंबियांसह, टाळ-मृदंग घेत जल्लोषात दर्शनासाठी आले होते. तर दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांनी मल्हाराच्या जयघोषात सहभाग नोंदवला.
यात्रेच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनीही चोख व्यवस्था केली होती. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, वळणदार मार्गदर्शन व नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
जेजुरीच्या गडावर नुसती यात्रा नव्हे, तर श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा संगम पाहायला मिळतोय.