बीड: बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना घडून गेल्यानंतर म्हणजेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अत्यंत क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्याचे सामाजिक, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलले आणि यानंतर थेट आज पहिल्यांदाच माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस हे दोघेही एकाच मंचावर दिसणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर जिल्ह्यात सामाजिक आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे उलथून पडली. देशमुख यांच्या हत्येनंतर धस यांनी थेट मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोघांमध्ये बंद दाराआड झालेली चर्चा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, ती भेट धसांना अडचणीत आणणारी होती त्यानंतर धस यांची आक्रमक भूमिका पुन्हा उफाळून आली. आणि या कारणाने दोघांच्या आजच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आज शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावात संत भगवान बाबा गडाच्या नारळी सप्ताहाचा सांगता समारंभ होत असून, या निमित्ताने दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण यावेळी महंत नामदेव शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. शास्त्री महाराज हे दोन्ही नेत्यांना सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी मार्गदर्शन करतील, अशी चर्चा आहे. या व्यासपीठावर ते दोघांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय दृष्टीनेही हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
धनंजय मुंडे हे मुंबईहून थेट हेलिकॉप्टरने या कार्यक्रमासाठी येणार आहेत, तर आमदार सुरेश धस आधीच उपस्थित असतील. यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील तणावग्रस्त राजकीय वातावरणात काहीसा बदल होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या भेटीनंतर धस-मुंडे यांच्यातील तणाव कमी होईल का? की पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटेल? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.