Sunday, February 15, 2026 07:59:20 AM

Raj Thackeray : 'माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय...?' राज ठाकरेंच्या टोलेबाजीने सभागृहात पिकला हशा, पाहा व्हिडीओ

राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः आपल्या प्रकृतीचे कारण देत त्यांनी मारलेला टोला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

raj thackeray  माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय राज ठाकरेंच्या टोलेबाजीने सभागृहात पिकला हशा पाहा व्हिडीओ

Raj Thackeray :  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात राजकीय वैमनस्य बाजूला सारून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः आपल्या प्रकृतीचे कारण देत त्यांनी मारलेला टोला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय?

राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवातच अतिशय हलक्या-फुलक्या वातावरणात केली. ते म्हणाले, "मला सध्या प्रचंड सर्दी झाली आहे, त्यामुळे उच्चारात थोडे बदल जाणवत असतील. मागे जेव्हा उद्धव आजारी होते, तेव्हा मी माझ्या फॅमिली डॉक्टरांकडून त्यांना औषध पाठवले होते. आता गेल्या सहा दिवसांपासून मी स्वतः त्यांच्याकडूनच उपचार घेतोय, पण अद्याप गुण आलेला नाही. त्यामुळे मी आज सकाळीच उद्धवला फोन करून विचारले की, 'माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय?' राज ठाकरेंच्या या विधानाने सभागृहात एकच हशा पिकला.

'गुलामांचा बाजार पाहून बाळासाहेबांना दुःख झाले असते' 

राज ठाकरेंनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाला त्यांनी 'गुलामांचा बाजार' असे संबोधले. "आजची ही बिघडलेली राजकीय परिस्थिती पाहायला बाळासाहेब आज हयात नाहीत, हेच एका अर्थाने बरे झाले. जे त्यांनी शून्यातून उभे केले, त्याची विल्हेवाट लागताना पाहून त्यांना प्रचंड यातना झाल्या असत्या," अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

हेही वाचा - Rohit Patil : लग्नाच्या प्रश्नावर आबांच्या लेकाचं मिश्किल उत्तर; नंतर सांगूनच टाकलं.. सांगलीत रंगली चर्चा

दरम्यान, बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकार रूपाबद्दल बोलताना राज ठाकरे आठवणींत रमले. ते म्हणाले की, "बाळासाहेब जेव्हा व्यंगचित्र काढायला बसायचे, तेव्हा ते एखाद्या समाधी अवस्थेत असल्यासारखे वाटायचे. बाहेर कितीही गदारोळ असला तरी त्यांच्या ब्रशमध्ये कधीच अस्वस्थता दिसली नाही. त्यांचे व्यक्तिमत्व हे सर्व राजकारण्यांपेक्षा वेगळे आणि अद्वितीय होते." तथापी, राज ठाकरेंनी स्पष्ट केले की, आज इतर पक्षांमध्ये दिसणारे अनेक बडे नेते हे बाळासाहेबांनीच घडवले आहेत. "तुम्ही फक्त त्यांची भाषणे ऐकली आहेत, पण त्यांचे व्यक्तिमत्व त्याहून कितीतरी मोठे होते," असेही त्यांनी नमूद केले.


सम्बन्धित सामग्री