आमीर हुसैन. प्रतिनिधी. बीड: बीड जिल्ह्यातील एका रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यानच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मृत महिलेचं नाव छाया गणेश पांचाळ आहे. 'डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच छाया पांचाळ या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे', असा आरोप यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यासोबतच, मृत महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप करत म्हटले की, 'प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी डॉक्टरांनी पैशांची मागणी केली होती. त्यावेळी तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी आमच्याकडून दोन हजार रुपये देखील घेतले. मात्र इतकं सगळं करूनही त्यांनी आमच्या पेशंटवर व्यवस्थित उपचार केले नाहीत.' या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महिला कर्मचाऱ्याचा असभ्य वर्तन उघडकीस
उपचार करताना गर्भवती महिलेला रक्तस्त्राव होत असताना जेव्हा तिच्या नातेवाईकांनी महिला कर्मचाऱ्याला, 'उपचार करा', असं सांगितल्यावर महिला कर्मचारी, 'आम्ही सर्वजण निघून जातो, तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा', असं उद्धट उत्तर दिलं, अशी माहिती मृत गर्भवती महिलेच्या आईने दिली.
डॉक्टरांचा हलगर्जीपणा बेतला गर्भवती महिलेच्या जीवावर
उपचारादरम्यान, अतिरक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले आणि त्यानंतर रक्ताची पिशवी मागितली. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया करत असताना जास्त वेळ लागला. या कालावधीत जरी तिचा मृत्यू झाला असला तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावर कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी देखील मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला रुग्णालय व्यवस्थेवर आरोप
उपचारादरम्यान, गर्भवती महिलेची नॉर्मल प्रसूती झाली आणि त्यानंतर गर्भवती महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला. डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत. त्यासोबतच, मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थेवर आरोप करत म्हटले, 'पेशंट सिरीयस आहे याची जाणीव असून सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणण्यास का सांगितले? नॉर्मल डिलिव्हरीमध्ये इतका रक्तस्त्राव झाला तरी कसा?' यासोबतच, अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे, नागरिकांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासोबतच त्यांनी म्हणाले, 'जर रुग्णालयाचा हा कारभार असाच सुरू राहिला तर रूग्ण अशा रुग्णालयामध्ये येऊन उपचार करण्यास पाठ फिरवतील. या घटना कमी होण्यासाठी रुग्णालय प्रशासनावर कडक कारवाई व्हावी आणि नागरिकांवर होणारे हाल कमी व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलायला पाहिजे,' अशी मागणी नागरिकांनी केली.