सांगली: सरकारच्या पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्तीवर मनसेने टीकेची झोड उठवली आहे. आता भाषेसंदर्भात मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहिलीपासून इंग्रजीही नको अशी मागणी डॉ. तारा भवाळकर यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीपर्यंत फक्त मातृभाषा गरजेची असल्याचे वक्तव्यही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी केलं आहे.
विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी. या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही, तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते. पण, असे न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जात आहे. हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक, अन्यायकारक असाच आहे. वास्तविक, पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदीच काय तर इंग्रजी विषयही असू नये, असे स्पष्ट मत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा: शिवभोजन थाळीचे अनुदान थकल्याने विदर्भातील केंद्र चालकांनी दिला आंदोलनाचा इशारा
नव्या शैक्षणिक धोरणानुसार, सरकारने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसोबतच तिसरी भारतीय भाषा शिकविली जाणार आहे. या निर्णयाला शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. भवाळकर यांनीही विरोध केला आहे.