जळगाव: राज्यात उन्हाळ्याची उष्णतेची लाट वाढली असताना, गेल्या दोन दिवसांत जळगावसह इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात तापमान 45 अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. अशातच, कडक उन्हात अचानक गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा शेतमाल उध्वस्त झाला आहे.
जिल्ह्यातील एरंडोल, यावल, भडगाव, चोपडा, अमळनेर आणि काही ग्रामीण भागात गारपिटीसोबतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे केळी, मका, कांदा, भाजीपाला यांसारख्या अनेक प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन त्यांच्या पीकांची लागवड केली होती. मात्र, या संकटामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया:
या घटनेवर शेतकऱ्यांनी सांगितले, 'एकीकडे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे, तर दुसरीकडे गारपीटीसारखे मोठे संकट आल्यामुळे पीकांचे खूप नुकसान झाले आहे. यामध्ये केळींच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. झुडुपांसोबत मक्याचे पीकही कोसळले आहे, तर कांद्याच्या शेंगांवर गारांचा परिणाम दिसत आहे.'
या भयानक संकटानंतरही सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. शेतकऱ्यांच्या मते, 24 तासांचा पाऊस पडूनही कोणतीही पाहणी झालेली नाही, पंचनामा झालेला नाही, भेट झालेली नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही. स्थानिक शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, 'अनेक शेतकरी खूप चिंतेत आहेत आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत.'
शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मदतीची मागणी:
'आम्ही शेतकऱ्यांनी सर्वकाही गमावून बसलो. मात्र, एवढं नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला कोणीही पाहण्यासाठी आलं नाही. प्रशासनाने लवकरच पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई द्यावी,' अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 'स्थानिक प्रतिनिधी आणि कृषी विभाग दखल घेतील का?' याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे नापिकी तर दुसरीकडे अवकाळी पाऊस:
गेल्या काही वर्षांमध्ये हवामानाच्या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले आहे. एकीकडे पीक नुकसान, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट, या दुहेरी संकटांमुळे शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे.
'सरकारने तातडीने बाधित क्षेत्राची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी,' अशी मागणी होत आहे. 'नाहीतर शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र होईल आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडू,' असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असून, प्रशासनाने या संकटाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारे उपाययोजना राबवाव्यात, हीच शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आहे.