मुंबई: वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्ती बाबत सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून होत आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी केले.
प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित ‘वक्फ सुधार जनजागर अभियाना’निमित्त झालेल्या कार्यक्रमात रिजिजू बोलत होते. वक्फ दुरुस्ती विषयक संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल, भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे प्रमुख मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी रिजिजू यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकातील प्रमुख बाबींचे विस्ताराने विश्लेषण केले. रिजिजू म्हणाले की, नव्या कायद्यामुळे गोरगरीब मुस्लिमांचे भले होणार आहे. मात्र ज्यांनी वक्फच्या मालमत्तांची वर्षानुवर्षे लूट केली त्यांना वक्फ मंडळांवरील ताबा सोडायची इच्छा नाही. याचसाठी या विधेयकाविरोधात सामान्य मुस्लिमांना भडकावण्याचे प्रयत्न चालू आहेत. विविध माध्यमांचा वापर करून भाजपा कार्यकर्त्यांनी सामान्य मुस्लिमांच्या मनातील या कायद्याविषयीचे गैरसमज दूर करावेत.
हेही वाचा : तात्पुरत्या स्वरुपातील 16 अतिरिक्त न्यायालये, 23 जलदगती न्यायालयांना 2 वर्षांची मुदतवाढ
गरीब मुस्लिमांना सध्याच्या वक्फ बोर्डाद्वारे काहीच फायदे होत नव्हते. त्यांना आता न्याय मिळेल. ज्यांनी अवैध पद्धतीने वक्फच्या माध्यमातून जमिनी हडप केल्या त्यांच्याकडून जमिनी काढून गोरगरीब मुस्लिमांना देण्यासाठी हे विधेयक आणले आहे, असेही रिजिजू यांनी नमूद केले. रिजिजू पुढे म्हणाले की, वक्फ कायद्यात 2013 मध्ये दुरुस्ती केल्यानंतर वक्फच्या ताब्यातील मालमत्ता प्रचंड वेगाने वाढल्या. ‘वक्फ बाय युजर’ ही तरतूद अत्यंत घातक होती. यामुळे वक्फ संपत्ती ठरविण्याच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येत नव्हते. हीच परिस्थिती कायम राहिली असती तर संसदेच्या इमारतीवरही हक्क सांगितला गेला असता. त्यातून भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या कायद्याविषयी जनतेपुढे जाताना आपले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सजग असावेत या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वक्फ विषयी प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्या मनात असलेल्या शंका दूर होतील. या कार्यशाळेत वक्फ दुरुस्ती विषयक संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी नव्या कायद्याविषयी असलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यशाळेपूर्वी रिजिजू यांनी पसमंदा मुस्लिम समुदायातील निवडक व्यक्तींशी संवाद साधला. वासिम खान, अश्रफ वांकर, रिदा रशीद आदी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.