मुंबई: अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी संघर्ष करत असलेल्या मातंग समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'मोर्चा अडवल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल' अशा स्पष्ट शब्दांत समाजाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे. 20 मे रोजी आझाद मैदानावर 'एल्गार मोर्चा' काढण्यात येणार असून, हा मोर्चा सरकारच्या विरोधातील जनआक्रोशाचा प्रखर आवाज ठरणार आहे.
राज्यभरातील मातंग समाज बांधवांनी एकत्र येऊन या लढ्यासाठी कंबर कसली असून, जिल्हा पातळीवर समाज समन्वयकांच्या बैठका पार पडत आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आंदोलनात उतरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राजाभाऊ सूर्यवंशी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, 'सरकारने जर आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर याचा स्फोट महाराष्ट्रभर होईल.'
या बैठकीला रमेश संमुखराव, रमेश दोडके, राजाभाऊ सूर्यवंशी तसेच मातंग समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. जून 2025 पासून अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करण्याची प्रमुख मागणी असून, सरकारने ती मान्य न केल्यास राज्यभरात मोठा संघर्ष उभा राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, आझाद मैदानात होणाऱ्या या एल्गार मोर्चावर आता सरकार कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.