विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला नेहमीच अवर्षण आणि दुष्काळाचा सामना करावा लागतो. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे येथील शेतकरी बऱ्याचदा हतबल झालेला पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका शेतकऱ्यांनी दहा वर्षांपूर्वी लावलेली मोसंबीच्या 500 झाडांवर जेसीबी फिरवला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडजी येथील किशोर गोजरे यांनी तीन एकर शेतात मोठ्या कष्टाने मोसंबी लावली. मेहनत करुन मोसंबीची रोपे वाढवली. 2020 पासून या बागेतून त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. यंदा मात्र पाणीटंचाईने डोकेवर काढले आणि पाण्याअभावी सर्व बाग वाळून गेली आहे. मोठ्या आशेने त्यांनी 2015 मध्ये तिन्हीही एकरात मोसंबीची बाग लावली. उधारी, उसनवारी करुन यासाठी त्यांनी भांडवल उभारलं. पैठण आडूळ परिसरातील रोपवाटिकेतून बागेसाठी त्यांनी पाचशे रोपे आणली. तळहातावरील फोडाप्रमाणे त्यांना वाढवले. दहा वर्ष मेहनत केल्यानंतर या झाडांना फळे लागली आणी गोजरे यांचे स्वप्न वास्तवात आले. तीन, चार हंगामात त्यांनी जवळपास दोन, अडीच लाख रुपये उत्पन्न घेतले. यंदा फळधारणा चांगली होती. मात्र पाणीटंचाईने डोकेवर काढले. अत्यल्प झालेल्या पावसामुळे नदी, नाले कोरडेठाक पडले आहेत. भुजलपातळी खाली सरकली परिणामी त्याच्या विहीरीने तळ गाठले. किशोर गोजरे यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण मोसंबीची बाग वाळून गेली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. बागेसाठी झालेला खर्चही यातून निघाला नाही. यामुळे उधारी आणि कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते सापडले आहेत. हंगाम वाया गेल्याने त्यांचे जवळपास दिड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
शासनाने मदत करावी
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी शेतकरी किशोर गोजरे सध्या मोलमंजुरी करीत आहेत. शासनाकडून आपली दखल घेतली जाईल, आर्थिक अनुदान मिळेल आणि आपण कर्जातून बाहेर येऊ या आशेवर गोजरे आहेत. प्रशासनाने आपले दु;ख जाणून घेत तातडीने पिकाचा पंचनामा करावा आणि आर्थिक मदत करावी.