नाशिक : नाशिक-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येवला तालुक्यातील अंदरसुल शिवारात आदित्य पेट्रोलियम समोर व्हॅगनआर कार आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच शीख बांधव गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका जबरदस्त होता की, कारचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संभाजीनगर येथील पाच शीख बांधव व्हॅगनआर कारमधून मनमाड येथील गुरुद्वारात दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, अंदरसुल शिवारातील आदित्य पेट्रोलियम समोर त्यांच्या कारची टेम्पोसोबत जोरदार धडक झाली. अपघातात कारमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
अपघातानंतर तातडीने मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी त्वरित पोलीस आणि रुग्णवाहिका यांना माहिती दिली. काही वेळातच जखमींना उपजिल्हा रुग्णालय, येवला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, एका महिलेला अधिक उपचारासाठी संभाजीनगर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
हेही वाचा :
जळगावात जुन्या वादातून सिनेस्टाईल हत्या, आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्रथमिक तपासानुसार दोन्ही वाहनांचा वेग अधिक होता आणि पुढे वळण असल्याने नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे. नाशिक-संभाजीनगर महामार्गावर अनेक वेळा अशा प्रकारचे अपघात घडले असून, या महामार्गावरील वळण आणि वेग नियंत्रक उपाययोजनांचा अभाव यामुळे दुर्घटनांची संख्या वाढत आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये पुरुष, महिला आणि एक वयोवृद्धाचा समावेश आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेने मनमाड परिसरातही हळहळ व्यक्त केली जात असून, . अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे येथे स्पीड ब्रेकर आणि इशारा फलक लावण्याची मागणी केली आहे.