आज नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही? असा आक्षेप घेतला. यावेळी महिला कर्मचाऱ्याकडून गिरीश महाजनांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा- "आम्हाला वंशाला दिवा हवायं...गर्भलिंग तपासणी कर...नाहीतर चालती हो..." सरपंचाच्या सुनेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर
या दोन महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात आणले. यादरम्यान दोन्ही कर्मचाऱ्यांनी 'सस्पेंड केलं तरी चालेल, मात्र मी कुणालाही घाबरणार नाही' असं ठणकावत सांगितले. घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे.