सोलापूर: सोलापुरात रविवारी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. चालत्या रेल्वेगाडीवर अनोळखी व्यक्तीने दगडफेक केल्यामुळे एका निष्पाप चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला .संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना रविवारी 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजयपूर-रायचूर पॅसेंजर गाडीत घडली. आरोही अजित कांगरे असे मृत चिमुकलीचे नाव असून ती सोलापूर शहरातील भवानी पेठ घोंगडेवस्ती येथे आजोबा अशोक कोळी यांच्याकडे राहत होती. इंडी तालुक्यातील लच्यान गावातील यात्रेनिमित्त ती आपल्या नातेवाईकांसोबत बाहेर गेली होती आणि परतीच्या प्रवासात ही दुर्दैवी घटना घडली.
चालत्या रेल्वेत आरोही ही मामाच्या मांडीवर उजव्या खिडकीजवळ बसलेली असताना, होटगी व टिकेकरवाडी स्थानकादरम्यान बाहेरून आलेल्या एका जोरदार दगडाने तिच्या उजव्या कानाजवळ घाव घातला. तात्काळ तिला उलटी झाली व ती बेशुद्ध पडली. ही परिस्थिती पाहून कुटुंबीयांनी तिला तातडीने टिकेकरवाडी स्थानकाजवळील खासगी रुग्णालयात नेले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला सोलापुरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा :सिंधुदुर्गात हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण; स्थानिक बाजारपेठेत प्रति डझन केवळ 300-500 रुपये
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आरोहीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या अमानुष प्रकाराविरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणी अद्याप अज्ञात व्यक्तीच्या विरोधात रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाले असून, घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
एका कोवळ्या जीवावर असा अमानुष हल्ला होणे म्हणजे समाजातील वाढते असंवेदनशीलतेचे प्रतिबिंब मानले जात आहे. केवळ काही क्षणांत एका कुटुंबाच्या आयुष्यावर काळाचे सावट कोसळले.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चालत्या रेल्वेगाड्यांवर दगडफेक रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहेत? सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या चिमुकलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण सोलापूर शहरात शोक व्यक्त केला जात असून, या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे.