Indian Politicians Died in Air Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सामर्थ्यशाली नेते अजित पवार यांच्या निधनाने अवघा देश स्तब्ध झाला आहे. बारामती येथे झालेल्या खाजगी विमान अपघातात अजित पवारांसह पाचही जणांचा अंत झाला. सहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या एका खंबीर नेतृत्वाचा असा अकाली अंत होणे, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस मानला जात आहे. मात्र, भारतीय इतिहासात विमान अपघाताने दिग्गज नेत्यांना हिरावून घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. शास्त्रज्ञांपासून ते संरक्षण प्रमुखांपर्यंत अनेक दिग्गजांचा प्रवास असाच अर्धवट राहिला आहे.
विमान अपघातात देशाने गमावलेली नेते
विजय रुपाणी
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ करताना कोसळले. विमानात पायलटसह 242 लोक होते, ज्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. रुपानी हे गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते होते आणि 2016 ते 2021 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
जनरल बिपिन रावत
8 डिसेंबर 2021 रोजी जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आली तेव्हा संपूर्ण देशाला हादरवून टाकले. रावत तेव्हा संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) होते, जे हे पद भूषवणारे पहिले व्यक्ती होते. सीडीएस हे तिन्ही सशस्त्र दलांचे सरकारचे सर्वोच्च लष्करी सल्लागार आहेत. जनरल रावत यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरजवळ कोसळले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि इतर 11 जण होते, जे सुलूरहून वेलिंग्टनला प्रवास करत होते.
वाय.एस. रेड्डी
2009 मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचेही विमान अपघातात निधन झाले. 2 सप्टेंबर 2009 रोजी त्यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे घनदाट नल्लामला जंगलात कोसळले. ते आंध्र प्रदेशातील सर्वात शक्तिशाली काँग्रेस नेत्यांपैकी एक होते. ते वाय.एस.आर. म्हणून प्रसिद्ध होते. वाय.एस. रेड्डी यांनी 2004 ते 2009 पर्यंत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
दोरजी खांडू
2011 मध्ये अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचेही हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. 20 एप्रिल 2011 रोजी ते 4 जणांसह तवांगहून इटानगरला जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले. 2007 पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
जी.एम.सी. बालयोगी
2002 मध्ये लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जी.एम.सी. बालयोगी यांचेही विमान अपघातात निधन झाले. 3 मार्च 2002 रोजी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून एक हेलिकॉप्टर त्यांना घेऊन जात होते. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूरजवळील एका तलावात हेलिकॉप्टर कोसळले.
माधवराव सिंधिया
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांचेही विमान अपघातात निधन झाले. 30 सप्टेंबर 2001 रोजी ते 10 आसनी खाजगी विमानातून एका राजकीय सभेसाठी जात असताना उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळ खराब हवामानामुळे ते विमान कोसळले.
हेही वाचा - Ajit Pawar Death : 66 वर्षे, 6 महिने आणि 6 दिवस..., अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी आकड्यांचा योगायोग समोर
संजय गांधी
काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे 23 जून 1980 रोजी एका दुःखद अपघातात निधन झाले. दिल्ली फ्लाइंग क्लब विमानात हवाई स्टंट करत असताना त्यांचे विमान नियंत्रण गमावून सफदरजंग विमानतळाजवळ कोसळले.
होमी जहांगीर भाभा
भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक मानले जाणारे भौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचेही विमान अपघातात निधन झाले. 24 जानेवारी 1966 रोजी भाभा यांना घेऊन जाणारी एअर इंडियाची फ्लाइट 101 क्रॅश झाली. द हिंदूच्या मते, जिनेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या चुकीच्या संपर्कामुळे विमान स्वित्झर्लंडमधील माँट ब्लँक येथे कोसळले.
सौदर्या सत्यनारायण
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती सौंदर्या यांचा जन्म 18 जुलै, 1972 रोजी कर्नाटकच्या कोलार येथे झाला. त्यांनी प्रामुख्याने तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सौंदर्या यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी निर्माण केलेला 'द्वीप' हा चित्रपट, ज्याला 2002 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांची नामांकने आणि सन्मान मिळाले होते. चित्रपटसृष्टीत यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर, सौंदर्या यांनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, त्याच वर्षी निवडणूक प्रचारासाठी विमानाने प्रवास करत असताना एका भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौंदर्या या केवळ एक उत्तम कलाकारच नव्हत्या, तर त्या संवेदनशील समाजसेविकाही होत्या. त्यांनी बंगळूरमध्ये 3 अनाथ विद्यालये सुरू केली होती. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे हे सामाजिक कार्य थांबले नाही; त्यांच्या आईने 'अमरसौदर्या विद्यालय' या नावाने अनेक शाळा चालवून त्यांचा वारसा आजही जिवंत ठेवला आहे. सौंदर्या यांचा मृत्यू 17 एप्रिल, 2004 रोजी बंगळूर येथे झाला.
अजित पवारांच्या जाण्याने मोठी पोकळी
अजित पवार हे केवळ महाराष्ट्राचे नेते नव्हते, तर प्रशासनावर पकड असलेला एक 'मास लीडर' होते. बारामती येथील हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड होता की हवामानाचा परिणाम, याची चौकशी आता सुरू झाली आहे. मात्र, या यादीत अजित पवारांचे नाव जोडले जाणे, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची न भरून येणारी हानी आहे.