सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत खानापूर-विटा मतदारसंघाचे शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका विधानाने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. "आमच्यासारखे 242आमदार पाठीशी आहेत, म्हणूनच ते मुख्यमंत्री आहेत," अशा शब्दांत सुहास बाबरांनी थेट आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते वैभव पाटील यांच्यावर टीका करताना सुहास बाबरांचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. पळशी येथील सभेत बोलताना त्यांनी केवळ वैभव पाटलांनाच नव्हे, तर वरिष्ठ नेतृत्वालाही इशारा दिला. "मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा सुहास बाबर कोण आहेत," असे म्हणत त्यांनी ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), ठाकरे गट आणि भाजप हे सर्व आपणच चालवतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या 'वन मॅन शो'च्या दाव्यामुळे मित्रपक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा- Suhas Babar on Fadnavis: "आमच्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री" सांगलीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान; भाजपच्या 'या' नेत्याला दिला इशारा
यानंतर आता भाजप नेते आणि जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी यावर पडखर प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, "ते ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचं आहे. त्यांची पहिलीच टर्म आहे. मला आश्चर्य वाटलं, एकेरी बोलत आहेत. पहिलीच वेळ आहे, मीच पक्ष चालवतो सगळे असं बोलत आहेत. मला वाटतं चुकीचं विधान त्यांचे आहे. राजकारणाची सुरुवात आहे, वर्षभरापूर्वी निवडून आलेत. लहान आहेत नवीन आहे राजकारण समजून घ्यावे. शिंदे साहेबांनी समज देण्याची गरज आहे. तोलून मापून बोललं पाहिजे, नाहीतर शेवटची टर्म ठरु नये"
पुढे राष्ट्रवादी विलीनीकरणावर गिरीश महाजन म्हणाले की, "तो त्यांचा प्रश्न आहे. कोण काय म्हणतोय... पवार साहेब म्हणतायत झालं झालं झालं.... मात्र एनसीपीचे दुसरऱ्या फळीतले नेते माहिती नाही बोलत आहेत. काय चर्चा झाली माहिती नाही. अंतर्गत चर्चा होती, वेगवेगळं सगळे बोलत आहेत. दोघे मिळून ठरवतील काय असेल ते..."