सिंधुदुर्ग: कोकणातील स्थानिकांना त्यांच्या गावातच रोजगार मिळावा यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी कोकणातील चाकरमानी नोकरीसाठी गुजरात, पुणे, ठाणे, मुंबई येथे स्थलांतर करायचे, मात्र आता त्यांना आपल्या गावातच रोजगार मिळावा यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. रोजगार हमी योजनेद्वारे मजुरांना काम उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
शेतजमिनीत खारे पाणी शिरल्याने अनेक जमीन खारभूमीत रूपांतरित झाली आहे. ही जमीन उत्पादकतेतून वगळली गेली असली तरी तिथे खेकडा शेतीसारख्या पर्यायांद्वारे रोजगारनिर्मिती करता येईल, असे गोगावले यांनी स्पष्ट केले. शासन यावर गांभीर्याने विचार करत असून लवकरच योजना कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री गोगावले यांनी विविध सूचनाही दिल्या. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कामांची संख्या वाढवावी, योजनांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि लाभ अंतिम घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा: Gold Price Today: ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम? सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
गोगावले यांनी फलोत्पादन योजनांबाबतही मत व्यक्त करताना बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. या लागवडीमुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होत असल्यामुळे ती चांगला पर्याय ठरू शकतो.
राजकीय घडामोडींवर बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली. 'आमची युती हिंदुत्वावर आधारित आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा आदर करत आम्ही काम करतो. दोघे भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना गोगावले म्हणाले की, 'महायुती म्हणूनच निवडणुकांमध्ये उतरणार आहोत. काही ठिकाणी अपवाद असतील, पण शिवसेना सज्ज आहे.'
दीपक केसरकर यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी दिलखुलास प्रतिसाद दिला. 'माझा कोट त्यांच्याकडे होता आणि मी मंत्री झालो. यावेळी त्यांनी मला कोट दिला. अडीच वर्षांनी काय घडेल ते पाहू, राजकारणात काहीही होऊ शकते,' असे सांगत त्यांनी संकेत दिले की, केसरकर यांना अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळू शकते.
या सर्व घडामोडी कोकणातील विकासाच्या दिशेने आणि स्थानिकांसाठी स्थायिक रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.