Rohit Pawar on Ajit Pawar Accident: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता या प्रकरणाला भीषण वळण मिळाले आहे. "हा केवळ अपघात नसून घातपातच आहे," असा दावा करत आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एका बड्या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाची परदेशी यंत्रणेमार्फत होणारी चौकशी थांबवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
युरोपीय एजन्सीचा तपास कोणी रोखला?
रोहित पवार यांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या तपासातील 'अदृश्य' अडथळा. बारामती विमान अपघाताचे सत्य बाहेर येण्यासाठी युरोपीय तपासा यंत्रणेची मदत घेतली जाणार होती. मात्र, महाराष्ट्रातील एका प्रभावशाली नेत्याने ही प्रक्रिया रोखून धरली, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. "सीआयडी तपासावर आमचा विश्वास नाही, आम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाची निष्पक्ष चौकशी हवी आहे," असे सांगत त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
पूर्व विदर्भातील 'तो' रहस्यमयी नेता आणि फाईलचं कनेक्शन
रोहित पवारांनी या संपूर्ण घटनाक्रमात पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी असा दावा केला की, त्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या भेटीमुळे अजित पवारांना निघायला मुद्दाम उशीर करण्यात आला. एका विशिष्ट फाईलवर स्वाक्षरी हवी असल्याच्या बहाण्याने वेळ काढण्यात आला. या उशिरामुळेच अजित पवारांना रस्ते प्रवास रद्द करून ऐनवेळी विमान प्रवासाचा निर्णय घ्यावा लागला. "तो नेता कोण आणि त्या फाईलमध्ये असे काय होते?" असा जळजळीत सवाल रोहित पवारांनी विचारला आहे.
हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: 'रोहित पवारांप्रमाणेच आम्हालाही यात मोठा कट वाटतोय...'; पिंकी माळीच्या वडिलांच्या दाव्याने खळबळ
विमान कंपनी आणि वैमानिकांबाबत संशयाची सुई
विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले की, ज्या कंपनीवर युरोपमध्ये बंदी आहे, तिला भारतात उड्डाणाची परवानगी कशी मिळाली? तसेच, त्या दिवशी नियोजित वैमानिक न येता दुसऱ्याच वैमानिकाला का पाचारण करण्यात आले? विमान तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते का, की ते जाणीवपूर्वक बदलले गेले? अशा अनेक तांत्रिक प्रश्नांनी आता या प्रकरणाचे गूढ वाढवले आहे.
28 जानेवारीच्या त्या काळरात्रीचा तपशील
अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषद प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8:43 च्या सुमारास त्यांचे 'लिअरजेट 45' विमान धावपट्टीजवळ कोसळले आणि स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, असिस्टंट पिंकी माळी आणि दोन वैमानिक अशा पाच जणांनी आपला जीव गमावला. या घटनेला आता घातपाताचा रंग मिळाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.