मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातून केरळपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक उष्णतेमुळे ढगांची निर्मिती होऊन हवामानात सतत बदल होण्याची शक्यता आहे.
तापमानात चढ-उतार; नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाल्यामुळे तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. यामुळे पूर्व विदर्भात 2 ते 3 मेदरम्यान जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अनुभव येऊ शकतो. या बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर आणि शेतीवरही होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून योग्य शेतीनियोजन करावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, भाजीपाला, आणि बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अमरावतीच्या मोझरी गावात गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान केलं असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. जरी धान शेतीला या पावसाचा फायदा होणार असला, तरी बहुसंख्य पिकांसाठी तो घातक ठरत आहे. हवामानातील या अस्थिरतेमुळे राज्यभरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.