Sushma Andhare: विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सुषमा अंधारे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आता या सर्व चर्चांना स्वतः अंधारे यांनीच पूर्णविराम दिला आहे. "आमदारकी किंवा खासदारकी शंभर वेळा कुर्बान," अशा शब्दांत आपल्या निष्ठेची ग्वाही देणाऱ्या अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम
अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंधारे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे त्या नाराज असल्याचा कयास लावला जात होता. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, "एखाद्या पदाची इच्छा व्यक्त करणे चुकीचे नाही, पण ते मिळाले नाही म्हणून नाराज होण्याचेही काही कारण नाही. राजकारणात एक संधी हुकली म्हणून सर्व काही संपत नाही, माझ्यासमोर अजून मोठा भविष्यकाळ आहे."
छत्रपती संभाजीनगरसाठी दानवेंची निवड योग्य
अंबादास दानवे यांच्या निवडीचे समर्थन करताना अंधारे यांनी पक्षाच्या रणनीतीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, 'छत्रपती संभाजीनगर हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तिथे सहा आमदार आणि खासदार होता. सध्या तिथे पक्षाला उभारी देण्याची गरज आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जर पक्षप्रमुखांनी दानवेंना संधी दिली असेल, तर तो निर्णय शिरसावंद्य आहे.' दरम्यान, आपल्याला डावलले गेल्याच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले. "सुषमा अंधारेला पद दिले नाही तरी ती पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, हा विश्वास कदाचित पक्षप्रमुखांना असावा. हा विश्वासच माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा सन्मान आहे," असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; अचानक उतरवलं जुहू एअरपोर्टवर
नीलम गोऱ्हे यांच्यावर बोचरी टीका
यावेळी बोलताना त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर विखारी टीका केली. "नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या व्यक्तींना वारंवार संधी द्यावी लागली, कारण त्यांना पद दिले नसते तर त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली असती. काही वेळा 'ब्लॅकमेल' करणाऱ्यांना पदे द्यावी लागतात, त्यातूनच गोऱ्हे यांना पदे मिळाली असावीत," असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.