Dr. Sarita Mhaske: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तेच्या समीकरणांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) कडून निवडून आलेल्या आणि 24 तासांपासून 'नॉट रिचेबल' असलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के अखेर समोर आल्या आहेत. "माझे कुणीही अपहरण केलेले नाही आणि मी गद्दारी करणार नाही," अशा शब्दांत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अफवांवर सोडलं मौन
डॉ. सरिता म्हस्के यांनी मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधून विजय मिळवला आहे. निवडणुकीपूर्वी त्या शिंदे गटातून ठाकरे गटात सामील झाल्या होत्या, त्यामुळे त्या 'नॉट रिचेबल' होताच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्यांच्या अपहरणाच्या बातम्याही काही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, "आज सकाळपासूनच माझ्या अपहरणाच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी माझ्या पक्षाच्या सतत संपर्कात होते आणि आजही ठाकरे साहेबांसोबतच आहे."
हेही वाचा - Prakash Ambedkar: ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा? वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
"गद्दारीचा प्रश्नच येत नाही"
डॉ. म्हस्के यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, "मला जर गद्दारीच करायची असती, तर मी तातडीने परत आलेच नसती. महापौर निवडीसाठी 30 तारखेपर्यंतचा वेळ आहे, तसेच कोकण भवन येथे सही करण्यासाठी 1 महिन्याचा अवधी आहे. अशा स्थितीत मला एकटीला घेऊन विरोधक काय साध्य करणार? मी खूप मेहनतीने इथपर्यंत पोहोचले आहे आणि पक्षाने माझ्या कठीण काळात मला तिकीट देऊन विश्वास दाखवला आहे, त्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठ आहे."
कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन
"वॉर्ड क्रमांक 157 च्या नागरिकांचा आणि माझ्या पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विरोधक मुद्दाम माझी बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचत आहेत," असा आरोपही त्यांनी यावेळी केला. माध्यमांना विनंती करताना त्या म्हणाल्या की, 'कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवू नका, मी शिवसेना (ठाकरे गट) मध्येच असून शेवटपर्यंत साहेबांसोबतच राहणार आहे.'