Sangram Bhandare: सामाजिक प्रबोधन करणारे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्या गुरुवर्यांवर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध म्हणून आपण हे पाऊल उचलल्याचे भंडारेंनी स्पष्ट केले. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या कृत्याचे समर्थन केले असून, "लवांडे यांचे तोंड काळं करायला मला उलट उशीरच झाला," असे आक्रमक विधान त्यांनी केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना संग्राम भंडारे म्हणाले की, विकास लवांडे यांनी गुरुवर्यांबद्दल केलेल्या विधानामुळे वारकरी संप्रदायात आणि अनुयायांमध्ये तीव्र संताप होता. लवांडे यांनी समाजातील आध्यात्मिक सेवा करणाऱ्या थोर व्यक्तींवर टीका करण्याची गरज नव्हती. आमच्या गुरुवर्यांनी आयुष्यभर समाजातील जातीयवाद संपवण्यासाठी आणि सामान्यांना आध्यात्मिक मार्गावर आणण्यासाठी सेवा केली आहे. अशा व्यक्तींवर होणारी चिखलफेक सहन केली जाणार नाही, म्हणूनच संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा दाखला देत आपण हे कृत्य केल्याचे भंडारेंनी सांगितले.
हेही वाचा - Attack On Vikas Lavande: 'पिस्तूल रोखलं, शाई फेकली अन्...'; राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?
कायदेशीर मार्गाचा अवलंब का केला नाही, या प्रश्नावर उत्तर देताना भंडारेंनी स्पष्ट केले की, आम्ही यापूर्वी पंढरपूरमध्ये लवांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, प्रशासकीय पातळीवर ठोस बदल होत नसल्याचे पाहून अखेर हा मार्ग पत्करावा लागला. "त्यांनी आमच्यावर टीका करावी, पण आमच्या गुरुवर्यांच्या वाटेला जाऊ नये," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, एका कीर्तनकाराने अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने विविध स्तरातून चर्चा रंगू लागल्या आहेत.