Wednesday, July 09, 2025 10:21:42 PM

IMD Issues Rain Alert: देशभरात अतिवृष्टीचा इशारा; 18 ते 23 जूनदरम्यान रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

IMD ने 18 ते 23 जूनदरम्यान देशात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अनेक राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन.

imd issues rain alert देशभरात अतिवृष्टीचा इशारा 18 ते 23 जूनदरम्यान रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

IMD Issues Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांमध्ये देशातील विविध भागांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः 19, 20, 21, 22 आणि 23 जून या कालावधीत पूर्वोत्तर भारत, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुजरात, महाराष्ट्रात 18  जूनपासून अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 जूनपासून गुजरात, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अत्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे नद्या दुथडी भरून वाहू शकतात, तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पूर्व भारतात 19 जूनपासून अति मुसळधार पाऊस

19 जूनपासून पश्चिम बंगालमधील गंगानदीच्या परिसरात, झारखंड, ओडिशा आणि पूर्वोत्तर भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशामध्ये 24 जूनपर्यंत काही भागांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने 14 जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा: मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू; राज्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

उत्तर भारतात मान्सूनची वाटचाल सुरू

दक्षिण-पश्चिम मान्सूनने उत्तर प्रदेशमध्ये थोड्या उशिराने म्हणजे 5 दिवस उशिरा आगमन केले आहे. सध्या सोनभद्र, बलिया, मऊ, गाझीपूर आदी जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर प्रदेशाच्या इतर भागांतही पोहोचण्याची शक्यता आहे.

राजस्थानात एक आठवडा आधी मान्सून

यंदा राजस्थानमध्ये मान्सूनने सामान्य वेळेपेक्षा एक आठवडा आधी म्हणजेच 18 जून रोजीच आगमन केले. उदयपूर, कोटा विभागात 18 ते 20 जूनदरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. गुजरात आणि बांग्लादेश परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राजस्थानमध्ये पाहायला मिळत आहे.

झारखंडमध्ये 20 जूनपर्यंत पावसाचा जोर

झारखंडमध्ये 18 जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला असून, 20 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे. रांची वेधशाळेच्या उपसंचालकांनी याबाबत माहिती दिली आहे की, संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे.

केरळमध्येही ऑरेंज अलर्ट

केरळच्या कासरगोड आणि कन्नूर जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसासह 40-60 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यावरील बंदी पुढील दोन दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Ashadhi Wari 2025: पंढरपूर वारीचं गुपित काय? शेकडो मैल चालणाऱ्या लाखोंच्या श्रद्धेमागचा इतिहास जाणून घ्या

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जलाशय, नद्या आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे, तसेच गरज असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. हवामान खात्याकडून सतत अपडेट्स घेणे आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहणे गरजेचे आहे.


सम्बन्धित सामग्री