Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्यामुळे ज्या महिलांचे 1500 रुपये रखडले होते, त्यांना आता दिलासा मिळणार आहे. अशा महिलांची अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष घराघरात जाऊन पडताळणी केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
बँकेच्या फेऱ्यांपासून सुटका; अंगणवाडी सेविका येणार दारी
योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे बंधन घातले होते. मात्र, अनेक महिलांनी ही प्रक्रिया करताना चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचे पैसे मिळणे बंद झाले होते. आता या समस्येवर तोडगा म्हणून लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर (Field Level) प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया त्रुटीपूर्ण आहे, त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका माहितीची खातरजमा करतील.
हेही वाचा - Budget 2026:शेतकऱ्यांना ‘लॉटरी’ लागणार? 1 फेब्रुवारीला होऊ शकतात मोठे निर्णय
1500 रुपयांचा मार्ग मोकळा
अनेक महिलांना गेल्या काही महिन्यांपासून हप्ते मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला होता. काही ठिकाणी आंदोलनेही झाली होती. आता प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, निकषात बसणाऱ्या सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये पुन्हा मिळण्यास सुरुवात होईल. यामुळे चुकीच्या माहितीमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या लाखो भगिनींना मोठा आधार मिळणार आहे.