येवला: भारताने कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, तर दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले आहे. भारतीय हवाई दलाने फक्त दहशतवाद्यांच्या स्थळांवर हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत शत्रू राष्ट्राकडून कोणत्याही प्रकारची क्रिया होऊ शकते. त्यामुळे सर्व भारतीयांनी सतर्क राहून सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सरकारकडून येणाऱ्या सूचना आणि नियमांचे पालन करावे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय सैन्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
हेही वाचा: भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; युद्धासारख्या परिस्थितीत कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? जाणून घ्या
माजी मंत्री भुजबळांची प्रतिक्रिया:
7 मेच्या मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबविली होती. यामध्ये पाकिस्तान येथील नऊ दहशतवादी हल्ले उद्ध्वस्त करण्यात भारतीय हवाई दलांना यश मिळाले आहे. यावर माजी मंत्री भुजबळ म्हणाले की, 'पाकिस्तानवरील हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. याबद्दल मी सर्व भारतीय सैन्यांचे, भारतीय हवाई दलांचे आणि मोदी सरकारचे अभिनंदन करतो. त्यासोबतच, त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या विरोधी पक्षाचे नेते आणि नागरिकांचे देखील मी अभिनंदन करतो'.
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे काही अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यावर भुजबळ म्हणाले की, 'या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे योग्य नाव देण्यात आले आहे. सत्तावीस भगिनींच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पतींना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. कुंकवाचा बदला काय असतो, हे भारताने दाखवून दिले आहे. अशावेळी आपण सर्वांनी एकजुटीने या परिस्थितीचा सामना करायला पाहिजे'.
हेही वाचा: 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक
'भारत-पाकिस्तान युद्ध परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र मिळून या परिस्थितीचा सामना करायला पाहिजे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अभिमानाने या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सध्या दहशतवादाविरुद्धचे युद्ध सुरू झाले असून हे एवढ्यात संपणार नाही. अशा परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अमेरिकेने दोन्ही देशांत मध्यस्ती करत दोन्ही देशांना धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. मोदींनी प्रत्येक भारतीयाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे', असे भुजबळ म्हणाले.