मुंबई: देशातील हवाई प्रवासाला मोठा धक्का बसवणाऱ्या Indigo Airlines च्या सेवा विस्कळीतपणामुळे अनेक मार्गांवरील तिकीट दर अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. लोकप्रिय मार्गांवर विमान तिकीट दरात विक्रमी वाढ झाली असून पुणे-मुंबई मार्गावरील Air India चे तिकीट तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे प्रवाशांना पाहायला मिळाले. नागपूर-मुंबई उड्डाणासाठीही 30 हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे आकारले जात आहे, ज्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून Indigo चे वेळापत्रक सतत बिघडत असून पुणे विमानतळावर त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवतो आहे.
शुक्रवारी Indigo ची 46 उड्डाणे रद्द झाली, ज्यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील उड्डाणांचा मोठा वाटा होता. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणेही रद्द झाली. दिवसातून अनेक वेळा वेळापत्रक बदलल्याने प्रवाशी अक्षरशः गोंधळून गेले. प्रवासी संकेतस्थळांचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की Indigo च्या समस्येचा फायदा इतर विमान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे. पुणे-मुंबई, मुंबई-नागपूर आणि नागपूर-पुणे या मार्गांवर तिकीट दर 30 हजार रुपयांपेक्षा अधिक लावण्यात आले आहेत. अचानक वाढलेल्या मागणीचा आणि मर्यादित उड्डाणांचा थेट फटका सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसत आहे.
हेही वाचा: Reserve Bank of India: मिनिमम बॅलन्सचं 'नो टेंशन', आता 'झीरो बॅलन्स'वरही मिळणार या सुविधा मोफत
दरम्यान, Indigo ची रद्द होणारी उड्डाणे विविध शहरांमध्ये आजही सुरूच असून पुणे मध्ये 42, श्रीनगर मध्ये 18, वाराणसी मध्ये 22, चंदीगड मध्ये 10 आणि अहमदाबाद मध्ये 19 उड्डाणे रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रवाशांची गैरसोय वाढतच असून हवाई प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ येत आहे.
नागपूर विमानतळावरही Indigo ची स्थिती चिंताजनक आहे. दररोज सात ते आठ उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. नियोजनाचा अभाव, वैमानिकांची कमतरता, चेक-इन प्रणालीतील तांत्रिक समस्या आणि संचालनातील त्रुटी यामुळे Indigo ची सेवा कोलमडल्याचे स्पष्ट दिसत आहे. काही प्रवाशांनी मुंबई-नागपूर प्रवासासाठी 39 हजार रुपये मागण्यात आल्याची माहिती दिली. Indigo ने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. यामुळे सलग चौथ्या दिवशी विमानतळांवर गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी होणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे मध्यरात्री पर्यंत रद्द करण्यात आली, ज्याचा परिणाम हजारो प्रवाशांवर झाला. गेल्या चार दिवसांत Indigo ने 1000 हून अधिक उड्डाणे रद्द केल्याने प्रवास व्यवस्था पूर्णपणे विस्कटली आहे. या गोंधळाचा फटका VIP पासून सामान्य प्रवासी आणि अधिकारी अशा सर्वांनाच बसला आहे.
हेही वाचा: आमदाराच्या लेकाचा थाटच न्यारा! तब्बल इतक्या लाखांची घोडी केली खरेदी