Tuesday, February 17, 2026 08:30:23 AM

Devendra Fadnavis : 'मशिदींवर लाऊडस्पीकर लावणे, हाच उबाठाचा...', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मतांच्या लांगुलचालनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आणि संविधानाची पायमल्ली करणे, हाच यांचा खरा चेहरा आहे, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

devendra fadnavis  मशिदींवर लाऊडस्पीकर लावणे हाच उबाठाचा देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : मशिदींवरील लाऊडस्पीकर पुन्हा लावण्याचे आश्वासन देणे, हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वैचारिक अध:पतन आहे. मतांच्या लांगुलचालनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आणि संविधानाची पायमल्ली करणे, हाच यांचा खरा चेहरा आहे, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईसह 29 महापालिकांच्या मतदानापूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरही भाष्य केले.

लाऊडस्पीकर वादावरून 'उबाठा'वर निशाणा

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून दिली. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच भोंग्यांविरुद्ध भूमिका घेतली होती. मी मुख्यमंत्री असताना कोणत्याही वादाविना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत भोंगे उतरवले होते. आता ते पुन्हा लावण्याचे गाजर दाखवणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे, असे फडणवीस म्हणाले. हिजाबवाली महापौर बसवण्याच्या वल्गना करणे आणि लाऊडस्पीकरची लालच दाखवणे, यापेक्षा मोठे लांगुलचालन दुसरे कोणते असू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - Ashish Shelar: 'आधी तुमचे राजकीय सल्लागार बदला...'; आशिष शेलारांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका

फडणवीस यांनी महायुतीच्या हिंदुत्वाचा 'आत्मा' स्पष्ट करताना सांगितले की, आमचे हिंदुत्व संकुचित नाही किंवा ते केवळ पूजा पद्धतीवर अवलंबून नाही. या देशाची प्राचीन संस्कृती आणि जीवनपद्धती मानणारा प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी हिंदू आहे. मराठी आणि हिंदू यांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. 

हेही वाचा - PADU Machine: PADU मशीन म्हणजे काय? राज ठाकरेंसह विरोधकांचा आक्षेप नेमका कशासाठी, बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर?

ठाकरे बंधूंच्या युतीवर 'टोलेबाजी'

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली. जर माझ्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, तर मला आनंदच आहे आणि यामुळे मला बाळासाहेबांचे आशीर्वादच मिळतील. मात्र, हा 'प्रीतीसंगम' नसून 'भीतीसंगम' आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकीय भीतीपोटीच दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला. 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा अंत होऊन विकासाचे सरकार येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


सम्बन्धित सामग्री