Monday, February 09, 2026 02:52:11 PM

KDMC Shivsena UBT: कल्याण - डोंबिवलीमध्ये महापौर निवडीपूर्वीच राडा; ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता, पक्षाकडून तक्रार दाखल

16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असलेल्या या नगरसेवकांप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सुरू आहे.

kdmc shivsena ubt कल्याण - डोंबिवलीमध्ये महापौर निवडीपूर्वीच राडा ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता पक्षाकडून तक्रार दाखल

कल्याण - डोंबिवली : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका संपल्यानंतर निवडणुकांचे कल मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात महापौर पदाच्या स्थापनेसाठी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) विशेष चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

मनसे आणि शिंदे गटाची शिवसेना युतीच्या चर्चांमुळे, तसेच गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे काही नगरसेवक संपर्काबाहेर असल्याने केडीएमसीतील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आला असून, ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांच्या बेपत्ता होण्यामुळे खळबळ उडाली आहे.

नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे सध्या बेपत्ता असून गेल्या काही दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली असता, “ते कुठे गेले आहेत याची कोणतीही माहिती नाही,” असे उत्तर मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेने या प्रकरणी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: KRK In Firing Case : त्या गोळीबारप्रकरणात केआरकेचा हात; मुंबई पोलिसांनी केली केआरकेला अटक

महत्वाची बाब म्हणजे, कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी दोन नगरसेवक सध्या बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. हे दोघेही कल्याण पूर्व विभागातील असून, 16 जानेवारी पासून ते संपर्काबाहेर असल्याची माहिती आहे.

या नगरसेवकांचे अपहरण झाले असावे किंवा त्यांच्याबाबत काही अनुचित प्रकार घडला असावा, अशी गंभीर शंका ठाकरे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याआधीच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी प्रत्येक पक्षाने आपापल्या नगरसेवकांची जबाबदारी घ्यावी, त्यांना आपल्या विभागात संभाळावे आणि सातत्याने संपर्कात ठेवावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, तरीही दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.

या संपूर्ण प्रकरणाबाबत जय महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, महापौर निवडीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना हे नगरसेवक नेमके कुठे गेले, हा प्रश्न सध्या सर्वांच्या समोर उभा राहिला असून, केडीएमसीतील सत्तासमीकरणांवर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: ISRO Indigenous Space Station: अवकाशात भारताचा हक्काचा 'विसावा'; इस्रोने नेमकी काय तयारी केलीय? वाचून अभिमान वाटेल


सम्बन्धित सामग्री