Thursday, May 15, 2025 12:15:17 AM

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचं काम स्थानिकांनी पाडलं बंद; जाणून घ्या

बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचं काम स्थानिकांनी पाडलं बंद जाणून घ्या

मुंबई: केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला डहाणू तालुक्यातील गोवणे गावातील रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. 'भूसुरुंगांच्या स्फोटांमुळे घरे थरथरत आहेत आणि त्यांना तडे जात आहेत', असा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. यामुळे कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुलेट ट्रेनचे काम थांबवून निषेधाचा मार्ग स्वीकारला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गोवणे गावात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या खोदकामादरम्यान सतत भूसुरुंगांचे स्फोट होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या स्फोटांमुळे गावातील अनेक घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत आणि जमीन खरडू लागली आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकंच नाही, तर रहिवाशांनी, 'आपली घरे, शेती, पर्यावरण आणि जीवनशैली धोक्यात आहे', अशी भावना व्यक्त केली आहे.

या निषेधामध्ये पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी

रहिवाशांच्या समर्थनार्थ, कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या निषेधामध्ये सहभागी झाले. आपला संताप व्यक्त करत ते म्हणाले की, 'विकास कामाच्या नावाखाली आपले सर्वांचे जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांमुळे सावसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, उलट नवीन समस्या निर्माण होतात', असे कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम काही काळासाठी स्थगित करण्यात आले असून, यावेळी प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलही घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आणि ठामपणे आपली भूमिका मांडली.

या प्रकल्पामुळे गावकऱ्यांचे घर धोक्यात

पुढे कष्टकरी संघटनेचे स्थानिक नेते म्हणाले की, 'या प्रकल्पाबाबत सरकारने आमच्यासोबत कोणत्याही प्रकारचे बोलणं केले नाही. आमची प्रतिक्रिया न घेता त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पामध्ये होत असलेल्या स्फोटांमुळे आमची घरे आणि निसर्ग सर्वकाही धोक्यात आले आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, मात्र हे विकास काम आमच्या दैनंदिन जीवनावर आक्रमण करू नये.' या परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन आणि प्रकल्पाचे अधिकारी गांभीर्याने पाहतील आणि स्थानिकांसोबत चर्चा करून योग्य मार्ग काढतील, अशी अपेक्षा रहिवाशांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले आहे.

या आंदोलनामुळे विकास आणि पर्यावरण यांच्यामधील संघर्ष पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. एकीकडे देशाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या आरामदायी व जलद प्रवासासाठी बुलेट ट्रेनचे काम थांबवले जात आहे, तर दुसरीकडे गावातील रहिवाशांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.


सम्बन्धित सामग्री