मुंबई: महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे हे त्यांच्या आक्रमक विधानांसाठी नेहमीच ओळखले जातात. मात्र, आता त्यांनी असदुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या 'एआयएमआयएम' (AIMIM) पक्षावर केलेल्या विधानामुळे राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नितेश राणे यांनी एआयएमआयएम या पक्षाला थेट 'दहशतवादी संघटना' संबोधले असून, ओवैसी यांची तुलना कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली आहे.
ओवैसी आणि लादेनमध्ये फरक काय?
नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत जहाल शब्दांत त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, "AIMIM ही केवळ एक राजकीय संघटना नसून ती एक दहशतवादी संघटना आहे. असदुद्दीन ओवैसी आणि ओसामा बिन लादेन यांच्या कामात मला काहीही फरक दिसत नाही. जे काम बिन लादेन अलकायदाच्या माध्यमातून जगभरात करत होता, तेच काम ओवैसी भारतात त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून करत आहेत." राणेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
'निवडून आल्यावर फक्त जिहादच केला'
ओवैसींच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राणे पुढे म्हणाले की, "या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर जनतेसाठी नेमके काय मोठे काम केले? त्यांच्या अजेंड्यावर विकासाऐवजी केवळ जिहादची भाषा असते. त्यांच्या शपथपत्रात किंवा कार्यपद्धतीत जिहाद व्यतिरिक्त दुसरे काहीही नसते. जिहादी मानसिकता पसरवणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे," असा खळबळजनक आरोप राणेंनी केला आहे.
हेही वाचा: RCB vs MI: यंदा पहिली मॅच जिंकली, पण अख्खा सीझनच देवाला! शेवटच्या चेंडूवर RCBची बाजी; MI प्लेऑफमधून बाहेर
AIMIM वर बंदी घालण्याची मागणी
देशाच्या सुरक्षेचा हवाला देत नितेश राणे यांनी या पक्षावर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे. "ज्याप्रमाणे केंद्र सरकारने पीएफआय (PFI) आणि अलकायदा यांसारख्या देशविघातक संघटनांवर बंदी घातली आहे, त्याच धर्तीवर एआयएमआयएमवरही तात्काळ बंदी घालण्यात यावी. अशा संघटना देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहेत," असे मत त्यांनी व्यक्त केले.
विरोधकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष
नितेश राणे यांच्या या घणाघाती टीकेनंतर आता एमआयएम आणि विरोधी पक्षांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही दोन गट पडल्याचे पाहायला मिळत असून, धार्मिक आणि राजकीय वादाला नवे तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्तेत असलेल्या मंत्र्याने अशा प्रकारचे थेट आरोप केल्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात उमटताना दिसतील.
हेही वाचा: PM Narendra Modi: 'सत्ता समीकरण बदलताच काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला'; काँग्रेस-डीएमके वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य