राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. सोबत असलेले अचानक विरोधात आणि विरोधात असलेले सोबत कधी येतील याचाही नेम नाही. असंच काहीसं घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणात. संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यामध्ये मोठ्या घडामोडी सुरू होत्या. त्यांना आता पूर्णविराम लागला आहे. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र आता भुसे यांनी खटला मागे घेतल्याने संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटींचा शेअर्स घोटाळा झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणात त्यांचा थेट निशाणा शिंदेसेनेचे नेते दादा भुसे यांच्यावर होता. मात्र राऊतांच्या आरोपांमुळे मंत्री भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्याचप्रमाणे मागील सुनावणीत हजर न राहिल्याने कोर्टाने संजय राऊतांना 12 हजारांचा दंड ठोठावला होता.
आजच्या सुनावणीत दादा भुसे आणि संजय राऊत एकत्रितपणे कोर्टात हजर झाले आणि भुसे यांनी खटला मागे घेतल्याने संजय राऊतांना दिलासा मिळाला आहे. मात्र या बातमीची खा.संजय राऊत यांनी सत्यता पडताळून बघितली त्यात चुकीचा आधार होता म्हणून आज मा.न्यायालयात संजय राऊत यांनी माफीनामा लिहून देत समस्त मालेगावकर जनता, शेतकरी व सभासद यांची दिलगिरी व्यक्त केल्याने मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा खटला आज न्यायालयात मागे घेतला असल्याची ॲड.सुधीर अक्कर यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा - Rohit Pawar on Ajit Pawar Plane crash : अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, 'VSRला मोठ्या लोकांचा सपोर्ट तर काही लोक सत्तेत...'
माध्यमांसमोर काय म्हणाले राऊत?
दादा भुसे आणि आमच्यातील वाद संपला आहे. ज्यांच्यामुळे हा विषय निर्माण झाला तेदेखील आमच्यात राहिले नाही. ते सत्तापक्षात गेलेले आहेत. आता त्यांचे त्यांनी पाहावे. दादा भुसे यांनी विनम्रपणाने हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केले. दादांचे आणि आमचे पूर्वीचे नातेसंबंध इथे कामी आले. माझ्या तब्येतीमुळे फार धावपळ करता येत नाही. तारखांना येता येत नाही. जे घडलं ते उत्तम घडले आहे असं त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Viral Video Of Baby Monkey: आईसह प्राणीसंग्रहालयात सर्वांनी नाकारलं, पण एका खेळण्याने दिला आधार; 'पंच' माकडाचा व्हिडीओ पाहून नेटीझन्स भावूक
तसेच पुढे ते म्हणाले की, "आम्हाला हा विषय संपवायचा आहे. हा कारखाना अद्याप उभा का राहिला नाही अशी माझी भूमिका होती. मी त्याबाबत नंतर माहिती घेतली. आता या विषयावर फार चर्चा करू नये", असं संजय राऊत म्हणाले.