Friday, March 13, 2026 09:57:25 PM

Rajya Sabha Elections: राज्यसभेचा 'विजयाचा फॉर्म्युला'; भाजपच्या तीन जागा फिक्स, पण चौथ्या जागेसाठी कोणाची लागणार लॉटरी?

अतिरिक्त मतांमुळे भाजप आणि शिवसेनेत रणनीतीची रस्सीखेच सुरू असून निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

rajya sabha elections राज्यसभेचा विजयाचा फॉर्म्युला भाजपच्या तीन जागा फिक्स पण चौथ्या जागेसाठी कोणाची लागणार लॉटरी

मुंबई: राजकारणात दोन आणि दोन नेहमीच चार नसतात, तर कधी कधी तो आकडा वेगळा सुद्धा असू शकतो. आगामी 2026 च्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा शह-काटशहाचा खेळ रंगणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजवले असून, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे ते महायुतीतील 'चौथ्या' जागेच्या पेचप्रसंगाने. सत्तेच्या साठमारीत मित्रपक्षांचीच कसोटी पाहणारी ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात नवी ठिणगी टाकणार का, हा कळीचा मुद्दा बनला आहे.

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळावर नजर टाकली, तर महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसते. भारतीय जनता पक्षाकडे अपक्ष आमदारांच्या भक्कम साथीने 136 आमदारांचे पाठबळ आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 56 आमदारांची ताकद आहे. या गणितानुसार, भाजपचे तीन उमेदवार सहजपणे दिल्लीची पायरी चढू शकतात, तर शिवसेनेचा (एकनाथ शिंदे गट) एक खासदार विनासायास राज्यसभेवर जाऊ शकतो. इथपर्यंतचा प्रवास अत्यंत सोपा आणि सुकर वाटत असला तरी, खरी राजकीय कसरत यापुढील मतरूपी शिल्लक आकड्यांमध्ये दडलेली आहे.

सध्याच्या राजकीय स्थितीनुसार महायुतीला सात पैकी सहा जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. यात दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, महायुतीच्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य चौथ्या (आणि युतीच्या एकूण सहाव्या) जागेवरून भाजप आणि शिवसेनेत छुपा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

हेही वाचा: Viral Video Of Baby Monkey: आईसह प्राणीसंग्रहालयात सर्वांनी नाकारलं, पण एका खेळण्याने दिला आधार; 'पंच' माकडाचा व्हिडीओ पाहून नेटीझन्स भावूक

विजयाचा कोटा पूर्ण केल्यानंतर भाजपकडे 16 अतिरिक्त मते शिल्लक राहतात, तर शिवसेनेकडे तब्बल 18 मते उरतात. आता प्रश्न असा उभा राहतो की, 'मोठा भाऊ' या नात्याने भाजप त्यांच्याकडील 16 मते शिवसेनेच्या पारड्यात टाकून मित्रपक्षाला झुकते माप देणार? की 18 अतिरिक्त मतांच्या जोरावर शिवसेना भाजपच्या उमेदवारासाठी मार्ग मोकळा करणार? हा 'तुझं-माझं'चा खेळ महायुतीच्या एकजुटीची सत्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार देशातील 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही द्विवार्षिक निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्रात 16 मार्च 2026 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतपेट्यांमधून राजकीय भवितव्य उलगडेल. येत्या 2 एप्रिल 2026 रोजी डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियांका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या सात दिग्गजांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत आहे. याच रिक्त होणाऱ्या जागांसाठी हा सर्व राजकीय खटाटोप सुरू आहे. दुसरीकडे, विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीला त्यांच्या संख्याबळानुसार एक जागा मिळण्याचे स्पष्ट चित्र आहे.

राजकारण हे शक्यतेचा खेळ आहे असे म्हणतात. त्यामुळे राज्यसभेच्या या आखाड्यात ऐनवेळी कोणती राजकीय खेळी खेळली जाते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. अतिरिक्त मतांच्या या 'मॅजिक फिगर'वरून महायुतीत कुरबुरी होणार की सामोपचाराने तोडगा निघणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. परंतु, तूर्तास तरी दिल्लीच्या तख्तावर आणखी एक शिलेदार बसवण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांनी पडद्यामागे जोरदार रस्सीखेच सुरू केल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Rohit Pawar on Ajit Pawar Plane crash : अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, 'VSRला मोठ्या लोकांचा सपोर्ट तर काही लोक सत्तेत...'


सम्बन्धित सामग्री