मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा चाणक्यनीती आणि आकड्यांच्या गणिताला धार चढली आहे. येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी रणशिंग फुंकले जाणार असून, महाराष्ट्रातील सात जागांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 5 मार्च असताना, महाविकास आघाडीच्या गोटात मात्र अद्याप 'एक जागा आणि तीन दावेदार' असे काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महायुती सहा जागा खिशात घालण्याच्या तयारीत आहे, तर उरलेल्या एका जागेवर महाविकास आघाडीचा एकमेव शिलेदार दिल्लीला जाणार हे निश्चित आहे. पण हा शिलेदार नेमका कोण, यावरून सध्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यसभेच्या या एका जागेवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव आघाडीवर आहे, मात्र सध्या त्यांचे बिघडलेले आरोग्य आणि रुग्णालयातील उपचार यामुळे मविआच्या हालचालींना काहीसा 'विराम' मिळाला आहे. शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असला, तरी त्यांच्या अनुपस्थितीत कोणताही ठोस निर्णय घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने असमर्थता दर्शवली आहे. जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी इतर मित्रपक्षांकडे चर्चेसाठी थोडा अवधी मागून घेतला आहे. शरद पवारांची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच राष्ट्रवादी आपली अधिकृत भूमिका मविआसमोर मांडणार आहे.
हेही वाचा: Indian Restaurant in London: 16 वर्षांपासून भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘Rangrez’ रेस्टॉरंट होणार कायमचे बंद; 'हे' धक्कादायक कारण आले समोर
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनीही या एका जागेवर आपला दावा ठोकण्याची तयारी दर्शवली आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असताना, विरोधकांची ही एकमेव जागा सुरक्षित ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत होणे अनिवार्य आहे. यासाठी मविआचे नेते सध्या अत्यंत सावधगिरीने पावले टाकत आहेत. 3 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची महत्त्वाची तारीख असून, आता हाताशी अवघे सहा दिवस उरल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राजकारणाच्या या धुमश्चक्रीत दुसरीकडे दिवंगत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळे शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. उद्या, 26 फेब्रुवारी रोजी वरळीच्या 'डोम'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार यांची! पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला जाण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होणारी ही प्रक्रिया या गटासाठी आपले अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करणारी ठरणार आहे.
एकूणच, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच वेळी दोन वेगवेगळ्या 'सत्ताकेंद्रांची' बांधणी सुरू आहे. एका बाजूला शरद पवारांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून असलेली महाविकास आघाडी रणनीती आखत आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या नेतृत्वाचा राज्याभिषेक करण्याची तयारी महायुतीतील राष्ट्रवादीने केली आहे. 5 मार्चपर्यंतचा हा काळ राज्याच्या राजकारणात अनेक 'ट्विस्ट' घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: Kokan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला कायमस्वरूपी जादा डबे, 166 नव्या जागांची वाढ