मुंबई: महाराष्ट्रात सध्या उन्हाचा चटका जबरदस्त जाणवत आहे. उत्तर पूर्व मध्य प्रदेशापासून मन्नारच्या आखातापर्यंत सक्रिय असलेली उत्तर-दक्षिण द्रोणिका रेषा विदर्भ, तेलंगणा, कर्नाटकमधील अंतर्गत भाग आणि तामिळनाडूपर्यंत पसरली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये हवामानात अचानक बदल पाहायला मिळत आहे.
हवामान विभागानुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्याफुलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेचा प्रकोप अधिकच वाढत आहे. अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला असून या भागांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत तापमानाने 40 अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. 20 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजेच 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याचप्रमाणे अकोला – 44.3 अमरावती – 44.4 नागपूर – 44, वर्धा – 44, यवतमाळ – 43.6 अशी विदर्भातील तापमानाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
मराठवाड्यातही ही स्थिती वेगाने गंभीर होत चालली आहे. बीड – 42.2, परभणी – 42.4 आणि औरंगाबाद – 41.6 अंश तापमानासह जनतेला घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बीड, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून जनतेला सक्त सूचना करण्यात आली आहे की, सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत घराबाहेर पडणे टाळावे.
मध्य महाराष्ट्रात जळगाव – 41 आणि सोलापूर – 43 अंश सोडले, तर पुणे – 38.7, नाशिक – 37.4, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या खाली आहे. मुंबईत हवामान तुलनेत सौम्य असून तापमान 31 अंश इतके आहे.
हवामान खात्याचा अंदाज आहे की उष्णतेची ही लाट येत्या दोन दिवसांतही कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भ व मराठवाडा भागात नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हवामान विभागाच्या सूचना:
गरजेचे नसल्यास दुपारी बाहेर पडू नका
भरपूर पाणी प्या, शरीर हायड्रेट ठेवा
अंगावर हलका व सूती पोशाख घाला
जास्त काळ उन्हात थांबणे टाळा