मुंबई: राज्यात उन्हाळ्याने कहर केला असून, मुंबईसह अनेक भागांवर अक्षरश: सूर्यकिरणांचा मारा होत आहे. मुंबईत सध्या तापमानाचा पारा 34 ते 37 अंशांदरम्यान आहे, मात्र दमट हवामानामुळे या उष्णतेचा अनुभव अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना शहर भट्टीसारखं जाणवत आहे. समुद्र किनाऱ्यालगत आकाश अंशतः ढगाळ असूनही उष्णतेपासून दिलासा मिळत नाही. नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेतही उष्णतेची तीव्रता जाणवत आहे.
महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि मध्य भागात देखील तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. काही ठिकाणी 40 अंशांच्या पुढे गेलेलं तापमान नागरिकांना हैराण करत आहे. विशेष म्हणजे, गिरीप्रदेशातही उन्हाच्या झळा जाणवत असून, थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या भागांमध्येही उष्म्याची झळ वाढली आहे. परिणामी, उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, राज्याच्या आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थानपासून ते कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या स्थितीमुळे हवामानात काहीसा बदल होण्याची चिन्हं आहेत, मात्र सध्या तरी मुसळधार पावसाची शक्यता नाही. ढगाळ हवामान राहू शकतं, पण त्यामुळं उष्णतेत फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. उलट, यामुळे वातावरणात अधिक दमटपणा निर्माण होणार आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेसोबतच दमट वारे त्रासदायक ठरणार आहेत. हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळं नागरिकांना अधिक घाम आणि थकवा जाणवत आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे असून, नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, बाहेर जाणं टाळावं आणि विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.